कुडाळ -जावळीच्या हक्काचा प्रतापगड सहकारी साखर कारखाना दुर्दैवाने बंद पडला म्हणून तो किसन वीर कारखान्यास चालवण्यास दिला. 16 वर्षांच्या कराराने चालवण्यास दिलेला कारखाना गेल्या तीन हंगामापासून बंद ठेवण्यात आला आहे.
कोणत्याही परिस्थितीत जावळीतील हा सहकार वड म्हणून ओळखला जाणारा प्रतापगड कारखाना सुरू झालाच पाहिजे. जर चालवायचा नसेल तर माझी तयारी आहे. सर्व जावळीकर उस उत्पादकांना घेऊन या कारखान्याचे टाळे तोडू, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला.
दरम्यान, कारखान्याचे संचालक सौरभ शिंदे यांच्याशी चर्चा झाली असून जावळीचा कारखाना पूर्वीच्या संचालक मंडळाच्या ताब्यात द्यावा, असेही त्यांनी नमूद केले. कुडाळ (ता. जावळी) येथे जरंडेश्वर कारखाना बचावासाठी जावळी तालुक्यातील उस उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते.
भविष्यात बोंडारवाडी धरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यास मोठ्या प्रमाणावर जावळीत ऊसाचे क्षेत्र वाढणार आहे. सध्या दीड लाख मेट्रिक टनाचे ऊस उत्पादन जावळीत होते. आणि अशा परिस्थितीत प्रतापगड बंद ठेवल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे.
इतर कारखान्यांपुढे आपला ऊस नेण्यासाठी शेतकऱ्यांना हात पसरावे लागत आहेत. सलग तीन हंगाम कारखाना बंद राहिल्याने येथील शेतकरी अडचणीत आला आहे त्यामुळे कारखान्यासाठी लढाई कोणी तरी केली पाहिजे, सातारा जिल्ह्यामध्ये लढण्याची भूमिका फक्त शशिकांत शिंदेच घेऊ शकतो. मी परिणामांचा विचार करत नाही.
जिल्ह्याच्या प्रगतीचा विचार करतो. जरंडेश्वर कारखाना बंद झाला तर हजारो शेतकरी ऊस उत्पादकांचे मोठे नुकसान होईल, म्हणूनच ही लढाई आहे, ही लढाई एकट्याने करून चालणार नाही, ती सर्वांना करावी लागेल, असेही श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले. जावळीतील उसासाठी जरंडेश्वरची जास्तीत जास्त तोडणी यंत्रणा उभी करून येथील उस शिल्लक राहणार याची जबाबदारी घेतो, अशी हमी त्यांनी दिली.
राजकारणासाठी ईडीने जरंडेश्वरवर कारवाई करू नये अन्यथा आंदोलनाच्या माध्यमातून जिल्ह्याची ताकद ईडीला दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी तसेच युवा कार्यकर्ते उपस्थित होते.