नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांमध्ये माझ नाव ऐकून मला धक्का बसला आहे. गरिबी, बेरोजगारी, महिला सक्षमीकरण यासारखे अनेक महत्त्वाचे मुद्दे असतानाही तुम्ही इतर सर्व मुद्दे सोडून फक्त माझ्यावर चर्चा करण्याचा निर्णय घेतलात, असा टोला रॉबर्ट वढेरा यांनी लगावला आहे. ही टीका रॉबर्ट वढेरा यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केली आहे.
रॉबर्ट वढेरा यांनी मोदी सरकार आणि तपास यंत्रणांकडून आपला मानसिक छळ होत असल्याचाही आरोप केला आहे. गेल्या पाच वर्षात तुमच्या सरकारकडून माझा प्रचंड मानसिक छळ करण्यात आला. तपास यंत्रणा, न्यायालय आणि कर विभागाकडून फक्त माझ्यावर मानसिक दबाव टाकण्यासाठी वारंवार नोटीस पाठवण्यात आली, असा आरोप त्यांनी केला आहे. माझ्याविरोधात एकही आरोप सिद्ध झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले अपयश लपवण्यासाठी वारंवार आपल्या नावाचा वापर करणं बंद करावे, असे त्यांनी म्हटले आहे.