नवी दिल्ली – संसदेचे सदस्यत्व गमावल्यानंतर राहुल गांधी यांनी आज काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी मोदी आणि अदानी यांच्यातील संबंधांवर देखील अनेक प्रश्न विचारले. सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राहुल गांधी भाजप विरोधात काहीसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा सावरकरांचे नाव घेत भाजपाला डिवचले.
सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राहुल गांधींनी पहिल्यांदाच सविस्तरपणे मीडियाशी बातचीत केली. या देशाने मला सर्व काही दिले आहे. त्यांनी मला आदर, प्रेम आणि सन्मान दिला आहे, त्यामुळे शेवटपर्यंत मी फक्त त्यांच्याबद्दलच बोलेन. मी देशाची फसवणूक करू शकत नाही. मी माझ्या लोकसभा मतदारसंघातील वायनाडच्या लोकांना पत्र लिहीन. ते माझ्या कुटुंबासारखे आहेत असं राहुल यावेळी म्हणाले.
राहुल गांधी पुढे म्हणाले,”मी तुम्हाला नर्व्हस वाटतो का? मला मजा येत आहे. या लोकांनी मला सर्वात मोठी भेट दिली आहे. माझे नाव सावरकर नाही, माझे नाव गांधी आहे आणि गांधी कोणाची माफी मागत नाहीत. मला अपात्र ठरवल्यानंतर त्यांनी लोकशाही संपल्याचे संकेत दिले आहेत” असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले.
“पंतप्रधान मला घाबरतात, मी त्यांच्या डोळ्यात भीती पाहिली आहे. अदानीवरील माझे पुढील भाषण संसदेत व्हावे असे त्यांना वाटत नाही म्हणून त्यांनी आधी लक्ष वळवले आणि नंतर मला अपात्र ठरवले” असा थेट आरोप यावेळी राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत केला. काल राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर देशभर काँग्रेसकडून निदर्शने करण्यात आली.