पिंपरी : “भाषा आणि संस्कृती यांच्यात अद्वैत असते. “माय’ म्हटल्यावर आपल्यापुढे संपूर्ण ग्रामीण संस्कृती उभी राहते. परंतु “माय’ची “आई’ आणि नंतर “मम्मी’ झालेली आहे,’ असे मत ज्येष्ठ लोककवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी नुकतेच चिंचवड येथे व्यक्त केले.
पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी आणि श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय (चिंचवड) यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात डॉ. वाघ यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सन्मान करण्यात आला.
आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीचे (महाराष्ट्र शासन) कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांना पद्मश्री सन्मान मिळाल्याबद्दल गौरविण्यात आले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हा हृद्य सन्मान करण्यात आला. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील अध्यक्षस्थानी होते. अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, विद्यालयाचे संस्थापक अण्णा जाधव, मुरलीधर साठे, मुकुंद आवटे आदी उपस्थित होते. विधिवत औक्षण, पुणेरी पगडी, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ अशा स्वरूपात दोन्ही सत्कारमूर्तींना सन्मानित करण्यात आले. डॉ. वाघ यांनी पहाडी आवाजात “काया मातीत मातीत, तिफन चालते…’ ही कविता सादर करून उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद घेतली.
पवार म्हणाले, देशात पहिल्यांदाच एका सरपंचाला पद्मश्री सन्मान मिळाला आहे. काम करीत राहिल्यास पुरस्कार मिळत राहतात. भविष्यात प्यायला पाणी मिळेल का? हा प्रश्न आजच भेडसावतो आहे. विद्यार्थ्यांना पाणी व्यवस्थापनाचे शिक्षण देण्याची गरज आहे.
डॉ. सबनीस म्हणाले, विठ्ठल वाघ आणि पोपटराव पवार हे खऱ्या अर्थाने काळ्या मातीचे सुपुत्र आहेत. गावमाती आणि गावशिवार हे त्यांच्या चिंतनाचे विषय आहेत. गावाच्या मातीचे अनुभवसिद्ध शहाणपण हे पोपटराव पवार यांच्याकडे आहे.
महात्मा गांधी यांनी जपलेल्या ग्रामीण संस्कृतीच्या सन्मानाचे प्रतीक म्हणजे पोपटराव पवार यांची पद्मश्री आहे. कवी भरत दौंडकर यांनी कवी संमेलनाचे सूत्रसंचालन केले. प्राचार्य बाळाराम पाटील, प्रतिभा देशपांडे, दत्तात्रय भालेराव, बाजीराव सातपुते, राजेंद्र वाघ, सुरेश कंक यांनी संयोजन केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. जयवंत भोसले यांनी आभार मानले.