महाबळेश्वर -करोनाच्या नियंत्रणासाठी व मृत्युदर कमी करण्यासाठी राज्य शासनाने “माझे कुटुंब, माझी जबाबदारी – कोविडमुक्त महाराष्ट्र’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेची सुरुवात महाबळेश्वरमध्ये पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. त्यामध्ये बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या कुटुबांमधील सदस्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले
मुख्याधिकारी म्हणाल्या, या मोहिमेत शहरातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांमधील करोनाची लक्षणे शोधून त्यांना तातडीने उपचार मिळवून देणे आणि बाधित रुग्णांनी नंतर कोणती काळजी घ्यायची, याचे प्रबोधन करणे, या मोहिमेत अपेक्षित आहे. ही मोहीम दोन टप्यांमध्ये राबविली जाणार आहे. पहिला टप्पा आजपासून सुरू करण्यात आला आहे. दुसरा टप्पा 14 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येईल. प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करून त्याबाबतची माहिती राज्य शासनाच्या ऍपमध्ये नोंदवण्यात येईल.
या मोहिमेसाठी पालिकेने सर्व प्रभागांमध्ये प्रशिक्षित कर्मचारी, स्वयंसेवक व नर्सिंग कर्मचाऱ्यांची पथके नेमण्यात आली आहेत. हे पथक नागरिकांच्या शरीराचे तपमान व ऑक्सिजन पातळी तपासणार आहे. नागरिकांनी पथकाला सर्व माहिती द्यावी. ही मोहीम करोनापासून आपले रक्षण करण्यासाठी असून भीती बाळगू नये.
करोनाची बाधा होऊ नये यासाठी आणि बाधितांनी व करोनामुक्त झालेल्यांनी कोणती खबरदारी घ्यावी, याची माहिती दिली जाणार आहे. दरम्यान, शहर करोनामुक्त करण्याचा पालिकेचा निर्धार आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष स्वप्नाली शिंदे यांनी केले आहे.