अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर बॉलीवूडमधील नेपोटिझम वॉर सुरू झाले आहे. अनेक स्टार किड्सवर जोरदार टीका होत आहे. अनेक नामांकित कलाकारही घराणेशाहीमुळे आलेले भले- बुरे अनुभव शेअर करताना दिसत आहेत. या चर्चेत आता अभिनेता अक्षय कुमार यानेदेखील उडी घेतली आहे. माझ्या मुलांना घराणेशाहीचा फायदा बिलकूल मिळणार नाही असं अक्षयने स्पष्ट केलंय.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अक्षय म्हणाला, घराणेशाही प्रत्येक क्षेत्रात आहे. तुम्ही कोणालाही त्यांच्या कुटुंबीयांना काम देण्यापासून थांबवू शकत नाही.आईवडिलांच्या ओळखीने एखाद्याला संघर्ष न करता संधी मिळू शकते. पण मेहनत केल्याशिवाय दीर्घकाळ टिकता येत नाही. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला बॉलीवूडमध्ये पाहायला मिळतील.
आरव आणि नितारा या माझ्या दोन्ही मुलांना मी आत्मनिर्भर होण्याचे संस्कार दिले आहेत. त्यांना इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर माझ्या स्टारडमचा फायदा मी घेऊ देणार नाही. त्यांनी स्वतः ऑडिशन द्यावी आणि कामं मिळवावी अशी माझी अपेक्षा आहे. कारण संघर्ष केल्याशिवाय यशाचा खरा आनंद त्यांना मिळणार नाही.