सोनभद्र (उत्तर प्रदेश) – आपण देशातील गरिबांच्याच जातीचे आहोत, अशा शब्दात पंतप्रधानांनी आज विरोधकांना प्रत्युत्तर दिले. उत्तर प्रदेशात मोदींच्या जातीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांच्या आघाडीला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कॉंग्रेस नेते सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावरही जोरदार टीका केली. 1984 सालच्या दंगलीबाबत पित्रोदा यांनी संवेदनहीन उद्गार केले होते.
विरोधकांनी उत्तर प्रदेशाची वाट लावली. आता सपा आणि बसपा स्वतःला वाचवण्यासाठीच पुन्हा एकत्र आले आहेत, असे सांगून ही आघाडी म्हणजे “महामिलावट’असल्याचा पुनरुच्चार मोदींनी केला. मोदी हे बनावट ओबीसी आहेत, अशी टीका बसपा नेत्या मायावती यांनी केली होती. त्यावर बोलताना “मोदीची एकच जात आहे, ती म्हणजे देशातील गरिबाची जात’ असे प्रत्युत्तर मोदींनी दिले.
आपल्या भाषणात मोदींनी राष्ट्रीय सुरक्षेवर सर्वाधिक भर दिला. पूर्वीच्या आघाडीच्या सरकारने गुप्तचर विभागाला कमकुवत केले होते. पोखरण अणू चाचण्या 21 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 11 मे 1998 रोजी झाल्याची आठवण त्यांनी करून दिली. ऐतिहासिक “ऑपरेशन शक्ती’च्या यशस्वीतेसाठी शास्त्रज्ञांचे अभिनंदनही त्यांनी केले.
मनमोहन सिंग हे देशातील सर्वात कमकुवत पंतप्रधान होते. रिमोट कंट्रोलवर चालणारे सरकार देशाला मिळाले होते. त्या सरकारमुळे देशाची अनेक आघाड्यांवर बदनामी झाली. धाडसी सरकार काय करू शकते, याचे उदाहरण बालाटोट एअर स्ट्राईकने देशाने बघितले आहे, असेही मोदी म्हणाले.
तिसऱ्या आघाडीच्या सरकारच्या काळात गुप्तचर विभाग कमकुवत केला. वाजपेयींच्या काळात त्या विभागाला दुरुस्त केले गेले. मात्र पूर्वीच्या काळात गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांना कमकुवत केल्याचे परिणाम देशाला भोगावे लागले होते. तिसऱ्या आघाडीच्या सरकारने जे केले, ते निव्वळ गुन्हा होते, अशा शब्दात मोदींनी तिसऱ्या आघाडीच्या सरकारवर टीका केली.