नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जगभरात जवळपास चार लाख चिमुकल्यांनी या जगात पाऊल ठेवले. या दिवशी जन्मलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या भारतातील बाळांची आहे, संयुक्त राष्ट्रे आंतरराष्ट्रीय बाल निधी (युनिसेफ) या संस्थेच्या अहवालात ही माहिती देण्यात आली.
जगभरात तीन लाख 92 हजार 78 अर्भकांचा जन्म झाला. त्यापैकी भारतात 67 हजार 385 बाळे जन्माला आली. त्यापाठोपाठ चीनमध्ये 46 हजार 299 मुलांचा जन्म झाला. नववर्षाची आणि नवदशकाची सुरवात ही आपल्या आपल्या आशा आणि आकांक्षांचे प्रतिक असते.
एवढेच नव्हे ते आमच्या पिढीपाठोपाठ येणाऱ्यांचेही भविष्याशी निगडीत असते, अशी भावना युनिसेफचे कार्यकारी संचालक हेन्रीएट्ट फोर यांनी व्यक्त केली.
या जगात पाऊल टाकू इच्छीणाऱ्या बाळांचे नशिब मात्र वेगवेगळे आहे. फिजीत नववर्षाच्या सुरवातीचा मुहूर्त पकडून जन्माला येणाऱ्या बाळांची संख्या सर्वाधिक आहे.
तर अमेरिकेत याच दिवसाच्या अखेरीस अपत्यप्राप्तीची संधी घेणारे सर्वाधिक आहेत. नवअर्भकांपैकी निम्मे हे केवळ आठ देशातील आहेत… भारत(67,385), चीन (46,299), नायजेरीया(26,039), पाकिस्तान(16,787), इंडोनेशीया (13,020), अमेरिका (10,452), कांगो (10, 247), आणि इथोपीया (8,493)