नवी दिल्ली: गलवान खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत चीनचे सैनिक मरण पावले. मात्र, त्यांची संख्या कमी दाखवण्यासाठी चीनने ते परस्पर गाडून टाकले, असे वृत्त अमेरिकेतील एका दैनिकाने दिले आहे. मात्र चीनने हा आरोप फेटाळला आहे.
मृत सैनिकांच्या कुटुंबीयांवर दबाव आणून मोठ्या प्रमाणात अंत्यसंस्कार करू दिले नाहीत. त्यांच्यावर चिनी सैन्याच्या देखरेखीखालीच दफन करण्यात आल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
पारंपरिक पध्दतीने अंत्यसंस्कार करता येणार नाहीत. त्यांचे अंत्यसंस्कार गोपनियरित्या केले जातील, असे चीनच्या गृहमंत्र्यांनी या कुटुंबीयांना सांगितले.
भारत आणि चीनच्या सैन्यात 15 जून रोजी धुमश्चक्री उडाली होती. त्यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर 70 जण जखमी झाल्याचे भारतीय बाजूने मान्य करण्यात आले होते. चीनने मात्र त्यांच्या बाजूने झालेल्या जीवीतहानीवर मौन बाळगले होते. त्यांनी जीवीतहानी जाहीर केलेली नाही.
मात्र चीनचे 40 सैनिक मरण पावले असावेत, असा कयास माध्यमांतून व्यक्त करण्यात येत होता. भारताचे मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी चीनचे किमान 40 सैनिक मरण पावल्याचे वक्तव्य केले होते.
शहीद झालेल्या भारतीय जवानांचे अंत्यविधी सन्मानपूर्वक करण्यात आले. मात्र महिना उलटूनही चिनी सैनिकांच्या काही मृतदेहावर अद्याप अंत्यसंस्कार केले नसल्याचे या वृत्तात म्हटले आहे. अमेरिकन गुप्तचर खात्यानेही चीन मृत सैनिकांची संख्या कमी दाखवण्याच्या प्रयत्नात असल्याचे म्हटले आहे.