पुणे – विसर्जन मिरवणुका आणि ढोल पथकांच्या वादनाने दणाणणारा आसमंत हे समीकरण दरवर्षी पाहायला मिळते. मात्र, यंदा करोना पार्श्वभूमीवर हे चित्र नसल्याने भाविकांसह वादकांमध्ये रुखरुख आहे. मात्र, वादनापेक्षा नागरिकांचे आरोग्य जपणे आवश्यक असल्याने प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका पथकांनी घेतली आहे. त्यामुळे यंदा वादन झाले नाही, तरी पुढच्या वर्षी अधिक दणक्यात वादन करू, अशी खात्री पथकांनी व्यक्त केली.
दरवर्षी साधारण जुलैमध्ये ढोल ताशांच्या सरावाच्या आवाजांनी गणेशोत्सवाची ओढ लागते. मात्र, यंदा करोनामुळे शासनाकडून मिरवणुकांवर निर्बंध घातले आहेत. याच अनुषंगाने ढोल-ताशा पथकांनी सामाजिक भान जपत वादन न करण्याचा निर्णय घेतला. असे असले तरी वादन होणार नसल्याने त्यांना चुकल्याचुकल्यासारखे वाटत आहे. शहरात सुमारे 150 अधिक ढोल-ताशा पथके असून, यावर होणारी आर्थिक उलाढाल लाखांच्या घरात असते. त्यामुळे यंदा यालादेखील फटका बसणार आहे.
यंदापेक्षा पुढील वर्षी अधिक जाणवणार परिणाम
दरवर्षी पथके 20 ते 30 टक्के रक्कम पुढच्या वर्षीसाठी वाचवून ठेवतात. ते पुढच्या वर्षी सराव, मांडव, वाद्य आदींसाठी वापरतात. यावर्षी बहुतांश पथकांनी करोना पार्श्वभूमीवर मदतीसाठी हे पैसे खर्च केले. यावर्षी अमदनी नाही आणि मागील वर्षीचे वाचलेले पैसे संपले. त्यामुळे पुढच्या वर्षी सुरुवातीचा कालावधी थोडा अवघड जाण्याची शक्यता आहे. विविध शहरांमध्ये स्थानिक पथके आहेत. पुण्यातल्या पथकांचे शहराबाहेर वादनासाठी जाण्याचे प्रमाणदेखील कमी झाले. याचा परिणाम यंदापेक्षा पुढील वर्षी अधिक जाणवणार आहेत.
यावर्षी ढोल आणि ताशाचा नाद ऐकता येणार नसल्याने वादक म्हणून दु:ख होत आहे. त्यामुळे आपल्या घरी असणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याने, ज्याप्रमाणे वाईट वाटते. त्याचप्रमाणे यावर्षी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे स्वागत आणि निरोप देता येणार नाही म्हणून वाईट वाटत आहे. पण देशाचा नागरिक म्हणून स्वत: आणि इतरांनी घरी राहून देशावरील करोनाचे संकट दूर व्हावे, यासाठी बाप्पाचरणी प्रार्थना करू. पुढच्या वर्षी नवीन जोमाने आणि आणखी ताकदीने गणेशोत्सव साजरा करू.
– निखिल गोखले आणि अभिषेक गायकर, धर्मयोद्धा पथक
पुण्याचा गणेशोत्सव जगभर प्रसिद्ध असून, मिरवणुकांमधील वाद्यपथके सर्वांचे मुख्य आकर्षण ठरतात. यंदा वादन न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाला साथ देत नियमांचे पालन करून वारीप्रमाणे यंदा खबरदारी घेऊनच गणेशोत्सव साजरा होईल. बाप्पा आपल्याला या करोनाच्या विळख्यातून नक्कीच वाट दाखवेल.
– मिहीर मुळे, रमणबाग पथक
मंडळे आणि प्रशासन जी भूमिका घेतील त्याबरोबर राहू, असे आम्ही यापूर्वी म्हटले होते. सरावदेखील सुरू नव्हते. माणसांचे आरोग्य हे वादनापेक्षा महत्त्वाचे आहे. वादकांमध्ये नाराजी आहे. परंतु, आरोग्याला प्राधान्य देऊन हा निर्णय आम्ही स्वीकारणार आहोत. मात्र, याकाळात काही नाविन्याचा शोध घेण्यासाठी देखील प्रयत्न असतीलच.
– पराग ठाकूर, अध्यक्ष, ढोल ताशा महासंघ