मुंबई – ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वकरंडक व आयपीएल या दोन्ही स्पर्धा झाल्याच पाहिजेत. त्यात सहभागी होत सरस कामगिरीसाठी सज्ज असल्याचे मत हिटमॅन रोहित शर्मा याने व्यक्त केले आहे.
करोनाचा धोका अद्याप कायम असला तरीही या स्पर्धा घेता येतील असा मला विश्वास आहे.
सध्याचे चित्र पाहता आयोजकदेखील संभ्रमात आहेत. या स्पर्धा आयोजित करण्याची तयारी जरी दाखवली गेली तरीही करोनाच्या परिस्थितीचा आढावा घ्यावाच लागणार आहे. तसेच खेळाडू, सदस्य, सपोर्ट स्टाफ, पंच, सामनाधिकारी व सामन्याच्या आयोजनाशी संबंधित सर्व घटकांच्या आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे व त्यानंतरच स्पर्धा आयोजित करण्याचा विचार केला जावा, असेही रोहित म्हणाला.
मार्चपासून हा धोका वाढतच गेल्याने पुढील सर्वच स्पर्धा रद्द कराव्या लागल्या तर, काही स्पर्धा लांबणीवर टाकाव्या लागल्या. त्याचबरोबर देशात लॉकडाऊन लावले गेल्याने सगळ्यांनाच घरात राहावे लागले. केवळ सामने होत नाहीत याच्या दडपणापेक्षा घरातच थांबल्याने निर्माण होणारी निराशाजनक मानसिकता दूर करणेच सर्वात मोठे आव्हान आहे, असेही रोहितने सांगितले.