अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांचे प्रतिपादन
नवी दिल्ली: संसदेत संमत झालेले कॅब विधेयक अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही. भारतीय मुस्लिम हे निर्वासित नाहीत आणि घुसखोरही नाहींत त्यामुळे त्यांनी याविषयी चिंता व्यक्त करण्याचे काहीच कारण नाही असे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष सय्यद घायोरूल हसन रिझवी यांनी म्हटले आहे.
या विधेयकाचे कारण पुढे करून या देशातील कोणत्याही मुस्लिमाला कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये अशी अपेक्षाही आम्ही सरकारकडून व्यक्त करीत आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.
या विधेयकामध्ये पारशी, ख्रिश्चन, शिख, जैन आणि बुध्दीस्ट यांनाही नागरीकत्व देण्याची तरतूद आहे, हे सर्व जणही अल्पसंख्यच आहेत असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले. भारतीय मुस्लिमांनी पाकिस्तान, बांगलादेश, आणि अफगाणिस्तानच्या मुस्लिमांची चिंता करण्याची काहीच गरज नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
भारतीय मुस्लिमांच्या हिताला या विधेयकामुळे कोणतीही बाधा पोहोचत नाही असे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. या देशाचे नागरीक असलेल्या कोणत्याही मुस्लिम नागरीकाला देशाच्या बाहेर घालवून दिले जाणार नाही असे गृहमंत्र्यांनीही स्पष्ट केले आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.