शिवेंद्रसिंहराजे भोसले; राजघराणे आणि मुस्लिम समाजाचे नाते अतूट
सातारा – छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीपातीच्या भेदभावाला थारा दिला नाही. तो आदर्श राजघराण्याने कायम ठेवला असून राजघराण्याचे आणि मुस्लिम समाजाचे नाते अतूट आहे. मी कोणत्याही पक्षात असलो तरी मुस्लिम बांधव आणि माझे संबंध कधीही दुरावणार नाहीत. आगामी काळातही मुस्लिम बांधवांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य देऊ, अशी ग्वाही भाजप-शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीचे सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
दरम्यान, राजघराण्याने मुस्लिम समाजाला नेहमीच आपुलकीची वागणूक दिली असून साताऱ्यात सर्व धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. सातारा-जावळीतील मुस्लिम समाज शिवेंद्रराजेंना मताधिक्य देणार, असा निर्धार सातारा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या मेळाव्यात करण्यात आला. यावेळी हाजी दिलावर बागवान, हाजी बाबा तांबोळी, माजी नगराध्यक्ष नासीर शेख, नगरसेवक शकील बागवान, अल्लाउद्दीन शेख, अमजद इनामदार, आदिल मोमीन, साजिद मुल्ला, सादिक शेख, आरिफ सय्यद, फिरोज पठाण, अन्सार आतार, ऍड. रफिक शेख, हाजी शौकत कच्छी, इक्बाल काझी, मुख्तार पालकर, सलीम कच्छी, नासीर बागवान, माजी उपनगराध्यक्ष जयेंद्र चव्हाण, हेमंत कासार, चंदन घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
मी यापूर्वी राष्ट्रवादीत होतो; पण मतदारसंघाच्या विकासासाठी आता भाजपमध्ये आहे. याची मुस्लिम समाजाला चिंता वाटायचे कारण नाही. भाजपमध्ये असलो तरी विकासाच्या मुद्द्यावर. सर्व जातीधर्मातील लोकांना सोबत घेऊन चालणे, म्हणजे विकासाची वाटचाल आहे. मोदींनी साताऱ्यातील सभेत कुठेही जातीभेदाचा उल्लेख केला नाही. ते जातीभेदाला थारा देतील, असे कदापि वाटत नाही. त्यामुळे गैरसमज आणि अपप्रचाराला महत्त्व न देता मुस्लिम समाजाने माझ्या पाठीशी राहावे. पक्ष बदलला म्हणून माणूस बदलत नाही. त्यामुळे मुस्लिम समाज किंतु, परंतु मनात ठेवणार नाही, अशी खात्री आहे. माझ्या माध्यमातून समाजाचे सर्व प्रश्न सुटतील, असे आश्वासन शिवेंद्रराजे यांनी दिले. हेमंत कासार, ऍड. रफिक शेख यांनी मनोगत व्यक्त केले. रफिक फरास यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.