शिर्डी -“सबका मलिक एक’ हे सांगणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत मंदिर आणि मशिदीवरील भोंगाचा आवाज बुधवारी बंद झाला. ध्वनीवर्धकांचा आवाज कमी करण्याचा निर्णय झाला असला तरी सकाळी साईबाबांच्या मंदिरातील काकड आरती व मशिदीमधील अजान विना भोंग्याचे शांततेत झाले.
साईंच्या मंदिरात दिवसभरात चार आरती होतात. सकाळी पाच वाजता काकड आरती, दुपारी 12 वाजता मध्यांन आरती, संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर धुपारती तर रात्री 10 वाजता शेजारती होत असते विशेष म्हणजे या सर्व आरती पंचक्रोशीतील सर्व भाविकांना लाऊडस्पीकरच्या माध्यमातून श्रवण करता येत होत्या तर दुसरीकडे गावातील मशिदीमध्ये दिवसभरात पाच वेळच्या अजानही मुस्लिम बांधवांना लाऊडस्पीकरद्वारे श्रवण करता येत होता. परंतु 3 मेला रात्री व पहाटे आरती व अजानचा आवाज बंद झाला आणि अनेकांना वाईट वाटले. परंतु सर्वोच्च न्यायालयाचे आदेश हे कायद्यानुसार सर्व धर्मियांना सारखेच आहे.
दरम्यान, साई मंदिरातील काकड आरतीसाठी लाऊडस्पीकर वापरण्यासाठी परवानगी देण्याची मागणी आता मुस्लीम समुदायाने पुढाकार घेत केली आहे.जामा मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष शमशुद्दीन इनामदार यांच्यासह मुस्लीम समुदायातील काही लोकांनी प्रशासनाला यासंदर्भात मागणी केली आहे, त्यांनी प्रशासनाला निवेदन केले आहे की,’आम्ही पहाटेच्या अजानसाठी लाऊडस्पीकर वापरणार नाही, परंतु साई मंदिरावरील काकड आरती आणि शेजारती भोंग्यावरून करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान,शिर्डी गावं हे शांतीची नगरी म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे. कारण साईबाबांच्या कृपेने सर्वधर्म समभाव याच धर्माच पालन करण्याची दिडशे वर्षाची परंपरा ह्या गावाला लाभली आहे. कारण याठिकाणी मशिद पण आहे आणि मंदिर सुद्धा, विशेष म्हणजे ज्या मशिदीमध्ये साईबाबांनी संपूर्ण आयुष्य गोरगरिबांच्या सेवेसाठी व्यथित केले. त्याच मशिदीमध्ये अखेरचा श्वासही घेतला आणि द्वारकामाई म्हणून ह्याच मशिदीची ओळख आज भाविकांसाठी श्रद्धेच ठिकाण बनलं आहे.साईबाबांनी कधीच आपली जात, धर्म आणि जन्मस्थान कुणालाही सांगितले नाही आणि याची कुठे नोंदही नाही. त्यामुळे सबका मलिक एक! याच विचाराने सर्व जाती धर्माचे देश विदेशातील श्रद्धाळू एकाच छताखाली येऊन साईबाबांच दर्शन घेतात आणि आनंदी होऊन आशीर्वाद प्राप्त करून घेतात.
ज्या शिर्डी गावात आजपर्यंत हिंदू मुस्लिम आणि इतर जाती धर्माचे लोक अनेक वर्षांपासून एकत्र राहतात, ते पण कुठलाही भेदभाव न ठेवता, विशेष म्हणजे साई मंदिरात मुस्लिमांना असलेला मान, ताबूतच्या मिरवणुकीत हिंदूंचा सहभाग आणि प्रत्तेक सणात आणि उत्सवात हिंदू मुस्लिमांचा एकोपा हे देशासाठी एकात्मतेसाठी सर्वात मोठे प्रेरणा देणारे शिर्डी हे एकमेव उदाहरण आहे. त्याच शिर्डीत आज अचानक हिंदू मुस्लिम प्रार्थना आणि आरतीचा आवाज शांत झाला.