नगर – नियोजनबद्ध पद्धतीने अल्पसंख्याक समाजातील व्यक्तींची मॉब लिंचिंगद्वारे हत्या केली जात आहे. याबाबत गांभीर्याने विचार करीत अल्पसंख्याक संरक्षण कायदा व्हावा, मुस्लीम समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी शुक्रवार (दि.5) रोजी अहमदनगर संघर्ष समितीतर्फे मुस्लीम बांधवांनी मॉब लिंचिंगच्या विरोधात मार्चा काढला. या मागण्यांचे निवेदन संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांना दिले.
कोठला मैदानातून दुपारी तीन वाजता मोर्चा निघाला. हा मोर्चा मंगलगेट, किंग्ज गेट, रामचंद्र खुंट, नालबंद खुंट, हातमपुरामार्गे भूजल सर्वेक्षणाच्या आवारात पोहचला. या मोर्चात मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. संघर्ष समितीच्या वतीने मौलाना इर्शाद, मौलाना अन्वर नदवी, हाजी मन्सूर शेख, अज्जू शेख, अब्दुल शेख, अबीद सय्यद यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
राज्य घटनेने सर्व भारतीयांना आपल्या धर्माप्रमाणे राहण्याचा व जीवन जगण्याचा अधिकारी दिला आहे. मात्र, काही समाजकंटक षडयंत्र करत आहेत. अल्पसमाजाची मॉब लिंचिंगद्वारे हत्या करून माणुसकी संपविण्याचा प्रकार होत आहे. झारखंड येथील तबरेज अन्सारी तो फक्त मुस्लीम समाजाचा तरूण होता म्हणून त्याला मारहाण करण्यात आली.