‘खयाल यज्ञ’ महोत्सवाचा समारोप
पुणे – पंडित भीमसेन जोशी यांची जन्मशताब्दी ही अभिवादनाची संधी आहे. आपल्या सर्वांना त्यांनी कानसेन केले. केंद्र सरकारच्या माध्यमातून कॉपीराइट कायद्याद्वारे कलाकारांना न्याय दिला. त्याप्रमाणे गीतकार, वादक आणि संगीतकारांनाही न्याय देणार आहे. बैठकांनंतर शिफारशींना येत्या दोन महिन्यांत अंतिम रूप देऊ. गीत, शब्द जिवंत असेपर्यंत कॉपीराइट कायद्याचा फायदा होत राहील, असे मत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे व्यक्त केले.
पंडीत भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगीताचार्य पंडित द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित “खयाल यज्ञ’ या महोत्सवाचा रविवारी समारोप झाला. पद्मभूषण पं. राजन आणि पं. साजन मिश्रा यांच्या उपस्थितीत वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमांचे उद्घाटन झाले. गोविंद बेडेकर, मंजुषा पाटील, श्रीकांत बडवे उपस्थित होते.
संगीत, साहित्य, कलेतून सांस्कृतिक पाया आणि राष्ट्रीयत्व समृद्ध होते. पंडित भीमसेन जोशी यांची संगीताशी बांधिलकी होती. हे संगीत आपल्याला पुढे जाण्याची उमेद देत असून, उभारी देण्याचेही काम करते. त्यामुळे हा संगीत महोत्सव ऐतिहासिक स्वरुपाचा ठरल्याचे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. डॉ. विनिता आपटे यांनी सूत्रसंचालन केले.
पहिल्या सत्रात शरद पवारांची उपस्थिती
पंडित भीमसेन जोशी यांनी देश एकसंध ठेवण्यासाठी प्रादेशिक आणि सामाजिक ऐक्य राखण्यासाठी सुरांच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका बजावली. देशात महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासारखे प्रश्न असताना त्याचा परिणाम होवू न देता देश एकसंध ठेवण्यात त्यांनी योगदान दिले, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले. “खयाल यज्ञ’ महोत्सवाला पहिल्या सत्रात पवार यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी पं. भीमसेन जोशी जन्मशताब्दी समितीचे अध्यक्ष खासदार गिरीश बापट, उद्योजक आणि स्वागताध्यक्ष पुनीत बालन, श्रीनिवास पाटील, शौनक अभिषेकी उपस्थित होते.