पुणे – आयपीएलसारख्या स्पर्धेतून करोडो रुपयांची कमाई होते यासाठी या स्पर्धेला नुकसान होऊ नये यासाठी बीसीसीआय सातत्याने फिल्डिंग लावताना दिसून येते. अमिरातीत ही स्पर्धा यंदा आयोजित करुन बीसीसीआयने हेच सिद्ध केले होते. आता पुढील वर्षी ही स्पर्धा भारतात बिनधोकपणे आयोजित व्हावी यासाठी नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेच्या आयोजनाचा घाट घातला आहे.
ही स्पर्धा पुढील वर्षी 10 ते 31 जदानेवारी या कालावधीत घेण्याचे मनसुबे बीसीसीआयने जाहीर केले असून त्यासाठी विविध राज्यांच्या संघटनांकडून मते मागवली आहेत. या स्पर्धेसाठी ठराविक केंद्रेच तयार करुन तिथे बायोबबल सुरक्षा पुरवली जाणार आहे. ही सर्व तयारी केवळ देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांसाठी जिव्हाळा असल्याच्या थाटात जरी बीसीसीआय करत असली तरीही त्यामागे पुढील वर्षी एप्रिल ते मे या दोन महिन्यांत आयपीएल आयोजित करण्यापूर्वी देशातील सर्व परिस्थितीचा तसेच करोनाच्या धोक्याचा आढावा घेतला जाणार आहे.
याबाबत बीसीसीआयच्या कोणत्याही सदस्याने प्रतिक्रिया देण्यात उत्सूकता दर्शवलेली नाही यातूनच बीसीसीआयला आयपीएलसाठी अनुकूल वातावरण तयार करायचे आहे हा हेतू स्पष्ट दिसून येत आहे. देशांतर्गत क्रिकेटच्यानव्या मोसमाला मुश्ताक अली स्पर्धेने सुरूवात करण्याचा विचार बीसीआयने बोलून दाखवला होता. तसेच सहा राज्यांमध्ये बायोबबल सुरक्षा तयार करुन ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. एकीकडे या स्पर्धेसाठी तयारी सुरू असतानाच राष्ट्रीय स्तरावरील सर्वात महत्त्वाची असलेली रणजी स्पर्धा कधी होणार याबाबत मात्र, अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही.
यंदा आयपीएल स्पर्धेत दोन नवे संघ येणार असल्याचेही संकेत देण्यात आले होते. मात्र, त्याला बीसीसीआय यंदा उत्सूक नसल्याचेही त्यांच्या वक्तव्यांवरुन सिद्ध होत आहे. नव्या वर्षी मोसमाचा प्रारंभ करण्यासाठी तसेच करोनाचा धोका किती राहील याचा अंदाज घेण्यासाठीच बीसीसीआयने मुश्ताक अली स्पर्धेचा घाट घातला असल्याचेही बोलले जात आहे.
लिलावासाठी अट्टहास…
पुढील वर्षीच्या आयपीएल स्पर्धेसाठी परंपरेनुसार लिलाव होणार आहे. यंदा करोनाचा धोका असल्याने हा लिलाव झाला नव्हता. मात्र, आता पुढील वर्षीच्या स्पर्धेसाठी खेळाडूंच्याही संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यातच स्पर्धेतील अनेक संघ त्यांच्याकडील अपयशी ठरलेल्या केळाडूंना मुक्त करण्याचीही शक्यता असल्याने या स्पर्धेसाठीचा लिलाव हा मोठ्या प्रमाणावर होणार आहे. त्यासाठीच सुयोग्य वातावरण असावे या विचारातूनच बीसीसीआयने अट्टहास सुरू केला आहे.