Kolhapur Murder – कोल्हापूर जिल्ह्यात काही महिन्यांपासून खूनाच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. त्यातच कागलमध्ये चारित्र्यांच्या संशयावरून पत्नीसह दोन मुलांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्यानंतर पोटच्या दोन मुलांचाही निर्घृण खून करून नराधम बाप पोलीस ठाण्यात हजर झाला. या घटनेने कोल्हापूर जिल्हा हादरून गेला आहे.
गायत्री माळी (वय 30), कृष्णात माळी (10) आणि आदिती माळी (16) अशी मृतांची नावे असून, प्रकाश बाळासो माळी (36) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, काळम्मावाडी वसाहती जवळील घरकुलमध्ये काल दुपारी दोन वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत ही घटना घडत राहिली. ( Kolhapur Murder )
प्रकाश माळी हा कागल शहरातील काळम्मावाडी वसाहतीजवळील घरकुलमध्ये पत्नी, मुलगा व मुलीसह राहतो. पत्नी कुणाशीतरी फोनवर बोलत असल्याचा राग मनात धरून प्रकाशने पत्नी गायत्रीचा वाद घालून गळा आवळून खून केला. यानंतर सायंकाळी शाळेतुन घरी परत आलेला मुलगा कृष्णात याने पप्पा असे का केले? असे विचारले.
त्यावर आपल्यानंतर मुलांचा सांभाळ कोण करणार? या शंकेने प्रकाशने दोन्ही मुलांचा दोरीने गळा आवळून ठार मारले. यानंतर तो पोलीस ठाण्यात हजर झाला. कागल येथील या तिहेरी हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे. ( Kolhapur Murder )