नवी मुंबई – नवी मुंबईत आईवडिलांसह दोन लहान मुलांची निघृर्ण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वाखारी येथे गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या या हत्याकांडाने नांदगाव तालुका हादरला आहे.
समाधान चव्हाण (37), त्यांची पत्नी भरताबाई चव्हाण (32), गणेश (6), आरोही (4) अशी मृतांची नावे आहेत. वाखारीजवळील जेऊर शिवारात समाधान चव्हाण हे पत्नी आणि दोन लहान मुलांसह राहत होते. गुरुवारी सायंकाळी जेऊर गावातील मधुकर सांगळे यांच्याकडे समाधान हे कांदे भरण्यासाठी आपली मालवाहू रिक्षा घेऊन गेले होते.
काही कांदे भरून झाल्यानंतर उर्वरित माल शुक्रवारी भरण्यात येणार होता. त्यामुळे पहाटे पाचपासून सांगळे हे समाधान यांना दूरध्वनी करत होते. परंतु, समाधान यांच्याकडून प्रतिसाद येत नसल्याने सकाळी सांगळे हे समाधान यांच्या घरी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. समाधान यांनी जेऊरचे सरपंच राजूभाऊ बोडके आणि वाखारीचे पोलीस पाटील चव्हाण यांना त्यासंदर्भात कळविले. पोलीस पाटील यांनी पोलिसांना माहिती दिली.
नांदगावचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे हे सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मनमाडचे उपविभागीय अधिकारी समीरसिंग साळवे हे देखील आले. चव्हाण दाम्पत्यासह दोन्ही मुलांवरही हत्याराचे वार करण्यात आल्याचे दिसून आले. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करित आहेत.