पुरावा नष्ट करण्यासाठी पुरला मृतदेह
पिंपरी (प्रतिनिधी) – उसने पैसे माघारी देत नसल्याच्या कारणावरून एक तरूणाचे अपहरण करून खून करण्यात आला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जमिनीत पुरला. हा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि. २) दुपारी कासारसाई येथे उघडकीस आला आहे.
संतोष शेषराव अंगरख (वय ४२, रा. पोलीस कॉलनी, रहाटणी) असे खून झालेल्याचे नाव आहे. शेषराव रंगनाथ अंगरख (वय ६३) यांनी बुधवारी (दि. २) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गणेश सुभेदार पवार आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील गणेश पवार याला पोलिसांनी अटक केली आहे.
सहायक निरीक्षक हरीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा संतोष यांनी आरोपी गणेश याच्याकडून व्यवसायासाठी उसने पैसे घेतले होते. त्या पैशाच्या कारणावरून त्यांच्यात वाद सुरु होता. दरम्यान, गणेश आणि त्याच्या दोन साथीदारांनी १६ ऑगस्ट २०२० रोजी संतोष याचे रहाटणी येथून अपहरण केले. त्यानंतर त्याचा खून करून मृतदेह कासारसाई येथे पुरला. या प्रकरणाचा तपास करीत असताना माने यांना आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी आरोपी गणेश याला ताब्यात घेत चौकशी केली. त्यावेळी त्याने खूनाची कबुली दिली.