संगमनेर (प्रतिनिधी) – दारू पिऊन येऊन घरात कायमच भांडण करणाऱ्या व्यक्तीस त्याच्या पत्नीने व मुलाने काठी व दगडाने मारल्याने त्याचा त्यात मृत्यू झाला. ही घटना संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथे शुक्रवारी (दि.22) रात्री घडली. याप्रकरणी आश्वी पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, तालुक्यातील झरेकाठी येथील रिक्षाचालक भरत वरखडे हे नेहमी दारू पिऊन घरात भांडण करत. शुक्रवारी (दि.22) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास भरत वरखडे, त्यांची पत्नी मंदा व मुलगा दादासाहेब यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले. यात भरत वरखडे यांनी मारहाण केल्याने पत्नी मंदा जखमी झाली होती. त्यामुळे मुलगा दादासाहेब याने तिला दवाखान्यात नेऊन प्राथमिक उपचार केले.
रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घरी आलेल्या दादासाहेब याने सततचे भांडण व आईला केलेल्या मारहाणीमुळे काठी तर पत्नी मंदा हिने दगडाने भरत वरखडे यांना बेदम मारहाण केली. त्यात भरत वरखडे यांचा मृत्यू झाला.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या. पोलिसांनी आरोपी दादासाहेब वरखडे यास ताब्यात घेतले आहे.