पिंपरी (प्रतिनिधी) – वडापावचे पैस न दिल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात एका तरुणावर कोयत्याने वार करत खून करण्यात आला. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी पाच जणांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे.
राज तापकीर, ज्ञानेश्वर राजेंद्र पाटील (वय 23), प्रवीण ज्योतीराम धुमाळ (वय 21), अविनाश धनराज भंडारे (वय 23), अजय भारत वाकोडे (वय 23) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह मोरेश्वर रमेश आष्टे (वय 21), प्रेम वाघमारे (सर्व रा. काळेवाडी) यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम जनार्दन नखाते (वय 22) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शुभमचे वडील जनार्दन आत्माराम नखाते (वय 52, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ज्ञानेश्वर पाटील आणि अजय वाकडे या दोघांची काळेवाडी परिसरात वडापावची गाडी आहे. काही दिवसांपूर्वी मयत शुभम याने ज्ञानेश्वर पाटील याच्या गाडीवर वडापाव खाऊन त्याचे पैसे दिले नव्हते. यावरून त्यांच्यात भांडण झाले होते. त्या दोघांनीही ऐकमेकांना संपविण्याची भाषा केली होती. त्यानंतर शुभम याने तुमच्या वडापावच्या हातगाड्याच येथे नकोत, अशी भूमिका घेतली. त्यामुळे अजय वाकोडे याच्याही मनात शुभमबाबत नाराजी निर्माण झाली. शुभम आणि आरोपी यांच्यातील भांडण दिवसेंदिवस वाढतच गेली. दोन दिवसांपूर्वीही त्यांच्यात भांडणे झाली होती.
आपली आपसांतील भाडणे मिटवून टाकू, असे सांगत बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास आरोपींनी शुभम यांना काळेवाडीतील धोंडीराम मंगल कार्यालयाजवळ बोलावून घेतले. मात्र त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास आरोपींनी आपसांत संगनमत करून शुभम यांच्या चेहरा, हात आणि डोक्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शुभम हा रक्ताच्या थारोळ्यात पडताच आरोपी पळून गेले. याबाबतची माहिती मिळताच नातेवाईकांनी शुभम याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापवूभ्रच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सातपैकी पाच आरोपींना त्वरीत अटक केली. तर उर्वरित दोन आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना केली आहेत.