लखनऊ – नुकतंच प्रसिद्ध कवी मुनव्वर राणा यांनी एक वक्तव्य केलं आहे. उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणूकीत योगी आदित्यनाथ पुन्हा निवडून आले तर मी राज्य सोडून कोलकाता येथे स्थायीक होईल. दरम्यान राणा यांनी एआईएमआईएमचे प्रमुश असदुद्दीन ओवैसी यांच्यावरही निशाणा साधला आहे.
ओवैसी हे मुस्लिमांची मते विभागून भाजपला मदत करण्यासाठी उत्तर प्रदेशात आले आहेत, असा आरोप मुनव्वर राणा यांनी केला आहे. कवी मुनव्वर राणा यांच्या मते, उत्तर प्रदेशात मुस्लिमांची मत विभागली जातात. उत्तर प्रदेशात येऊन ओवैसी इथल्या मुस्लिम समाजाला फसवत आहेत. तसेच मुस्लिमांच्या वोट बँकेत फूट पडून ते भाजपला मदत करत आहेत.
मुनव्वर राणा पुढे म्हणतात, निवडणूक जिंकण्यासाठीच हे सगळं केलं जात आहे. अशा प्रकारे मुस्लिमाला त्रास देणं हे भाजप सरकारचं एकमेव काम आहे. मग तो धर्मांतरण कायदा असो की, लोकसंख्या नियंत्रण कायदा असो किंवा दहशतवादाच्या नावाखाली अटक.
या अगोदर १ आणि २ जुलैच्या रात्री कवी मुनव्वर राणा यांच्या लखनऊमधील ललकुआन येथील फ्लॅटवर रायबरेली पोलिसांनी छापा टाकला होता. या छाप्यात कारवाई दरम्यान मुनव्वर राणा आणि त्यांच्या मुलीशी पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा आरोप मुनव्वर यांनी केला आगे.
दरम्यान २८ जूनला राणा यांच्या मुलावर रायबरेली येथे हल्ला झाला होता. मात्र, नंतर पोलिसांनी रायबरेली येथून चार जणांना अटक केली आणि दावा केला की तबरेजने स्वतःच त्यांच्या चार काका आणि चुलतभावांना अडकवण्यासाठी त्यांच्या गाडीवर गोळीबार करवून घेतला होता. याप्रकरणात तरबेजला पकडण्यासाठी पोलिसांनी छापा सुद्धा टाकला होता.
मुनव्वर राणा यांनी आरोप केला होता की, रात्री अचानक पोलिस त्यांच्या फ्लॅटवर आले आणि जोरजोरात दरवाजा ठोठावू लागले. यामुळे कुटुंबातील लोक घाबरून गेले. आणि जेव्हा दार उघडलं तेव्हा आठ ते दहा पोलिस घाईघाईने आत शिरले आणि प्रत्येक खोलीत तबरेजला शोधू लागले. मुन्नवर राणा यांच्या कुटुंबातील महिला व मुलींनी इतक्या रात्री अशा प्रकारे पोलिसांनी घरात प्रवेश केल्यानं भीती निर्माण झाल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं.
तसंच पोलिसांच्या वर्तवणुकीचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाइल सुद्धा हिसकावण्यात आला. २८ जून रोजी मुनव्वर राणा यांचा मुलगा तबरेज राणा याने रायबरेली येथील सदर कोतवाली येथे गुन्हा दाखल केला होता.