लोहगाव-वाघोली रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न कायम
येरवडा – वाघोली मुख्य रस्त्यावरील कर्मभूमीनगरजवळ पावसाचे पाणी दरवर्षी साचते. या रस्त्याची पाहणी खासदार गिरीश बापट यांनी केल्यानंतर हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग आली; परंतु याबाबतचे काम मात्र अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे पालिकेचे अधिकारी खासदारांचे ऐकत नाहीत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वाघोली मुख्य रस्त्यावर पाणी साचत असल्याने वाहनचालकांसह नागरिक त्रस्त आहेत. गेल्या काही वर्षांपासून हा प्रश्न कायम आहे. याही वर्षी या ठिकाणी पाणी साचले आहे. याची पाहणी खासदार बापट यांनी केल्यानंतर पालिकेच्या पथ विभाग, ड्रेनेज विभाग, बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी केली; परंतु याबाबत पुढील कार्यवाही रेंगाळली असून कामही सुरू झालेले नाही. याबाबत खादारांनी आदेश दिलेले असताना काम सुरू होत नसल्याने भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
नगरसेवक राहुल अप्पा भंडारी, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जगताप, नगरसेविका अश्विनी किशोर पोकळे, भाजप वडगावशेरी मतदार संघाचे अध्यक्ष संतोष लाला खांदवे, सुनील खांदवे, संदीप मोझे, आदित्य खांदवे, रावसाहेब राखपसरे, दीपक खांदवे, स्वप्निल खांदवे आदीं याबाबत पाठपुरावा करीत आहेत. कर्मभूमी प्रतिष्ठानच्या वतीने आयुक्तांना मोहनराव शिंदे, सुनील खांदवे यांनी निवेदन दिले आहे. यानुसार नाल्याच्या प्रवाहात जी बांधकामे सुरू आहेत, पाण्याच्या प्रवाहाला अडथळा ठरत आहेत त्यांना नोटीस देऊन कारवाई केली जाईल, असे बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.