नगर – शहरात पॅगो रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा वाढला आहे. प्रवाशांना घेण्यासाठी अचानक रिक्षा थांबवणे, चौकात कुठेही रिक्षा उभ्या करणे, मनमानी पद्धतीने प्रवाशांकडून भाडे आकारणे, अशा गोष्टी वाढत असून बेशिस्त रिक्षा वाहतुकीमुळे नगरकर त्रस्त झाले आहेत. या बेशिस्त रिक्षा चालकांवर वाहतूक शाखा कारवाईचा बडगा उगारणार का? असा सवाल संतप्त नागरिकामधून उपस्थित केला जात आहे.
शहरातील माळीवाडा बस स्थानाका बाहेरील दोन्ही बाजूस बेशिस्त रिक्षाचालक हे रस्त्यातच उभे राहतात. त्यामुळे वाहतूकीची कोंडी होते. कोणी याबाबत बोलल्यास हे रिक्षा चालक हाणमान करण्यास उतरता. तसेच रस्त्यावर अचानक थांबतात. प्रवाशांसह रस्त्याने जाणाऱ्या इतर वाहनचालकांनाही याचा फटका बसू लागला आहे.
शहरातील मुख्य भागात जुनी महनगरपालिका कार्यालय, दिल्ली गेट, न्यू आर्ट कॉलेज, पत्रकार चौक, झोपडी, कॅंटीन परिसर, प्रेमदान चौक, बोल्हेगाव, नागापूर, एमआयडीसी परिसर तसेच स्वस्तीक चौक, सक्कर चौक, कायनेटीक चौक, केडगाव, चादनी चौक, स्टेट बॅंक, भिंगार परिसर, भिस्तबाग चौक याठिकाणी बेशिस्त रिक्षा चालकाचे प्रत्यक्ष उदाहरण पहावायास मिळत आहे. शहर वाहतूक विभागाने याबेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करावी. अशी मागणी नागरिकामधून होत आहे.
बसस्थानकाबाहेर थेट रस्त्यातच रिक्षा दिवसभर उभ्या करतात. त्यामुळे या परिसरातील वाहतूक धोकादायक झाली आहे. दुचाकी वाहनचालकांचे हाल होत आहेत; तसेच बसचालकांना बस चालवतानाही कसरत करावी लागत आहे. या रिक्षांमुळे येथील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. त्यामुळे येथील वाहतुकीचे योग्य नियोजन करणे आवश्यक बनले आहे.