औंध- बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांसाठी विविध सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक समारंभ यासाठी बांधण्यात आलेले कै. सौ. हिराबाई मारुतीराव धनकुडे महिला बहुउद्देशीय सभागृह अखेर महानगरपालिकेतर्फे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डास भाडेतत्त्वावर देण्यात आले आहे. पण, यात आश्चर्य वाटण्यासारखी बाब म्हणजे यास बाणेर येथील कोणत्याच लोकप्रतिनिधींनी विरोध केलेला नाही.
बाणेर येथील या सभागृहाचे उद्घाटन 2017 मध्ये करण्यात आले. या बहुउद्दशीय सभागृहात परिसरातील नागरिकांचे लग्न, समारंभ, वाढदिवस तसेच राजकीय कार्येक्रम देखील होत होते. परिसरातील गरजू नागरिकांना याठिकाणी कमी खर्चात आपले समारंभ घेता येत होते. याठिकाणी अनेक लग्न समारंभ देखील होत होते. परंतु, आता, महानगपालिकेच्या मुख्यसभेची मान्यता होऊन हे सभागृह 15 वर्षांसाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड भारत सरकारला जवळ पास 96 हजार रुपये महिना भाडेतत्वावर देण्यात आले आहे.
दुमजली असलेल्या या सभागृहाचे दोन्ही मजले भाड्याने देण्यात आले. खरे तर या ठिकाणी परिसरातील गोरगरीब नागरिक लग्न समारंभ तसेच इतर कार्यक्रम होत होते व याच उद्देशाने या सभागृहाची निर्मिती करण्यात आली होती. या ठिकाणी महानगर पालिकेतर्फे अनेक समाज उपयोगी कार्येक्रम आयोजित करता आले असते. उत्पन्न वाढीसाठी महानगरपालिका नागरिकांच्या सुविधांवर गधा आणत आहे, असे मत परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.