पिंपरी – फ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत (प्रभाग 11) साने चौक, चिखली येथील साईभूमी सोसायटीमध्ये वारंवार सांडपाणी वाहिनी तुंबत आहे. मागील महिन्यापासून ही समस्या आहे. परंतु महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तात्पुरती उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामुळे वारंवार येथे सांडपाणी, मैलामिश्रित पाणी साचून राहत आहे. परंतु आज चक्क हे दूषित पाणी परिसरातील सोसायटी आणि दुकानांत शिरले आहे. त्यामुळे येथील नागरिक आणि व्यावसायिक महापालिकेच्या यंत्रणेबाबत संताप व्यक्त करत आहेत.
मागील महिन्यात चिखली येथील साने चौकाजवळ असलेल्या भाजीमंडई परिसरातील ड्रेनेजलाइन सातत्याने तुंबत आहे. त्यामुळे भाजीमंडईमध्ये येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. पाणी रस्त्यात साचून राहत असल्याने पर्यायी मार्गाचा नागरिकांना अवलंब करावा लागत आहे. परंतु ड्रेनेजलाइन तुंबत असलेले ठिकाण रहदारीच्या आणि महत्त्वाच्या रस्त्यावर असल्याने येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांची मोठी अडचण निर्माण होत आहे. तिथे राहणाऱ्या रहिवाशांच्या घराबाहेर हे घाण पाणी साचून सर्वत्र दुर्गंधी पसरली जात आहे. त्याच बरोबर डासांचा प्रादुर्भाव अधिक वाढत जाऊन तेथील रहिवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. मात्र याकडे क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.
या ठिकाणच्या सांडपाणी वाहिन्या तुंबून पार्किंगमध्ये तसेच दुकानात पाणी शिरत आहे. सतत भिंती ओलसर राहिल्याने कुंबट वास येऊ लागला आहे. वर्षभरात अनेक वेळा ड्रेनेज लाईन तुंबून ते घाण पाणी माझ्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये जाते. त्याच बरोबर जिन्यामध्ये दोन फूट पाणी साचते. व्यवसायिकांना बादलीने पाणी उपसून बाहेर काढावे लागत आहे. प्रशासनाकडून किमान मूलभूत सुविधा मिळाव्यात एवढीच अपेक्षा आहे. परंतु पिंपरी चिंचवड सारख्या स्मार्ट सिटीमध्ये अद्याप ड्रेनेज समस्येला सामोरे जावे लागत आहे ही शोकांतिका असल्याचे येथील रहिवासी बळीराम पवार यांनी सांगितले.
मोठ्या आकाराच्या वाहिन्या टाका
येथील जुन्या वाहिन्या बदलून नवीन आणि मोठ्या आकाराच्या सांडपाणी वाहिन्या टाकाव्यात अशी मागणी सोसायटीचे रहिवासी करत आहेत. या सोसायटीमध्ये तीनशेहून अधिक नागरिक राहतात. याशिवाय 11 व्यावसायिक गाळे आहेत. सोसायटीमध्ये 10 वर्षांपूर्वी सांडपाणी वाहिन्या बसविण्यात आल्या. मात्र त्याची साफसफाई वेळेवर केली जात नाही. तुंबल्यावर क्षेत्रीय कार्यालयात तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप येथील स्थानिकांनी केला आहे.