पिंपरी – ज्याचे दात चांगले, त्याचे आरोग्य चांगले असे म्हटले जाते. दाताचे दुखणे असह्य होते आणि दातावरील उपचारही खूप महागडे असतात. जे सर्वसामान्यांनाही परवडत नाहीत. अशा परिस्थितीत शरीरासाठी धोकादायक ठरू शकणाऱ्या वेदनाशामक औषधे खाण्याशिवाय गरीबांकडे पर्याय नसतो. आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी तरी दातदुखीचा त्रास सहन करावाच लागतो. परंतु गोर-गरीब आणि सर्वसामान्यांच्या दातदुखीकडे मात्र पिंपरी चिंचवड महापालिका मात्र दुर्लक्ष करत आहे.
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात (वायसीएम) दातांच्या सर्वसमावेशक उपचारांची सुविधा नसल्याने रुग्णांना खासगी दवाखान्यांवर अवलंबून रहावे लागत आहे. अपुरी साधनसामग्री, मनुष्यबळाची कमतरता आणि साहित्यासाठी दोन-दोन वर्षे निविदा प्रक्रिया होत नसल्याने गरीब रुग्णांना दातदुखी दुखणे वेदनाशामक गोळ्यांवर शमवावी लागत आहे.
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात सर्व प्रकारचे रुग्ण उपचारासाठी येतात. त्यात दात, तोंडाचे आजार असणाऱ्या रुग्णांचा समावेश आहे. हिरड्यांचे आजार, दंतक्षय, कर्करोग आणि कर्करोग पूर्व त्यावरील उपचार येथे होत नाहीत. येथे केवळ जबडा आणि त्याच्याशी संबंधित शस्त्रक्रिया केल्या जातात. त्याही कमी खर्चातील किंवा खर्च न लागणाऱ्याच शस्त्रक्रिया येथे होतात. दातांशी संबंधित इतर उपचार येथे फारसे होत नाहीत. त्याचा फटका रुग्णांना बसत आहे.
हे दुर्लक्ष घातक
दातांच्या किरकोळ उपचारांसाठी खासगी दवाखान्यांमध्ये हजारो रुपयांचा खर्च येतो. समस्या जटील असल्यास आणि अत्याधुनिक पद्धतीने उपचार करावयाचा झाल्यास ते सर्वसामान्यांना परवडणारे नाही. दंत उपचार मेडीक्लेममध्येही कव्हर होत नाहीत. यामुळे नाइलाजास्तव मेडीकलमधून पेनकिलर गोळ्या घेऊन दातदुखीच्या रुग्णाला दिवस काढावे लागतात. अधिक पेनकिलर खाणे आरोग्यासाठी खूप घातक असते. हे सर्व माहीत असतानाही पालिकेकडून मात्र दंत विभागाकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मौखिक आजार बळावतात. हे दुर्लक्ष शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक आहे.
सक्षम दंत विभागाची गरज
साधनसामग्रीचा अभाव असतानाही येथे आठवड्याला किमान 2 ते 3 प्रमुख दात, जबडा यांच्याशी संबंधित शस्त्रक्रिया केल्या जातात. शहराची वाढती लोकसंख्या आणि रुग्णसंख्या पाहता व दातांशी संबंधित आजारांशी निगडीत उपचारांसाठी दंतविभाग सक्षम बनवणे
आवश्यक आहे.
धक्कादायक वास्तव
वायसीएमच्या दंत विभागात केवळ एकच दंतसर्जन आहे. त्यांच्यावरच संपूर्ण विभाग अवलंबून आहे. तर त्यांना सहकार्य करण्यासाठी तीन निवासी डॉक्टर आहेत. परंतु साधनसामग्री नसल्याने इच्छा असूनही डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करता येत नाहीत. साधनसामग्रीचाही अभाव असल्याने दातांमध्ये चांदी भरणे किंवा अत्यंत सामान्य उपचारांसाठी देखील रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागते. खासगी दवाखान्यातील खर्च परवडणारा नसल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. साहित्यासाठी दोन-दोन वर्षे निविदा प्रक्रिया होत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
महापालिका कर्मचारीही सुटले नाहीत
दात आणि त्याच्याशी संबंधित उपचार हे सौदर्य प्रसाधनांमध्ये गणले जातात. त्यामुळे दातांवरील उपचार कमी खर्चात किंवा मोफत होत नाहीत. तसेच अपघातात दातांना इजा झाली किंवा काढावा लागला, पडला तरी त्याचा मोबदला दिला जात नाही. त्यामुळे हा विभाग अत्यावश्यक आहे. महापालिका कर्मचाऱ्यांसाठी धन्वंतरी योजना आहे. मात्र, दातांच्या उपचारासाठी त्यांना इतर रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे त्यांनाही आर्थिक भुर्दंड बसतो.