महर्षीनगर (प्रतिनिधी) – सातारा रस्ता ते सुयोग सेंटर रस्त्यावर विद्युत वाहिनी टाकण्याच्या कामासाठी महावितरणला दिलेली मुदत संपल्यानंतरही खोदकाम करण्यात आल्याने महानगरपालिकेकडून महावितरण विरोधात पोलिसांत तक्रार करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे मुदत संपल्यानंतर काम सुरू करताना याबाबतची माहिती वाहतूक विभाग व महानगरपालिका यांना देणे बंधनकारक होते; परंतु अशी कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे महावितरणने केलेले सदर काम हे नियमबाह्य ठरत असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याच करणास्तव महावितरण विरोधात पोलिसांत तक्रार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
महावितरण विभागाला सदर ठिकाणी खोदकाम करण्यास महानगरपालिकेकडून 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतरही सुमारे तीन महिन्यांनंतर विद्युत वाहिनी टाकण्याचे काम महावितरणकडून करण्यात आल्याचे तसेच ते चुकीच्या पद्धतीचे असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात आली आहे. दिलेली मुदत संपल्यानंतरही खोदकाम करून पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान केल्याबाबतची तक्रार महावितरण विरोधात पोलिसांत करण्यात येणार आहे, याबाबतची कार्यवाही लवकरच करण्यात येईल, असे पालिकेच्या पथ विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
संबंधित खोदकाम करण्याची परवानगी 31 मार्चपर्यंत दिली होती. ती संपलेली असतानाही कोणतीही माहिती न देता, महावितरणने हे खोदकाम नियमबाह्य केले आहे. त्याबाबत पोलिसांकडे तक्रार करून कायदेशीर कार्यवाही केली जाईल.
– आदिल तडवी, उपअभियंता पथ विभाग, पुणे महानगरपालिका