पुणे – करोनाचा प्रसार वाढत असतानाही आर्थिक गाडा रूळावर आणण्यासाठी खंबीरपणे निर्णय घेऊन शहर विकासाला चालना देणारे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना राज्यशासनाने तडकाफडकी “बदलीची भेट’ दिली आहे. दरम्यान, गायकवाड यांच्या जागी पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार यांची आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.
गायकवाड यांच्याकडे पुन्हा साखर आयुक्तपदाचा पदभार देण्यात आला आहे. शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याच्या निर्णयास गायकवाड यांचा विरोध होता. त्यामुळे आता शहरातील वाढत्या करोना प्रादुर्भावाचे खापर गायकवाड यांच्यावर फोडत त्यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. तर, शहरात दहा दिवसांचे लॉकडाऊन सुरू होणार असतानच शासनाने शनिवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणात प्रशासकीय बदल केले. यात विद्यमान साखर आयुक्त सौरभ राव यांची बदली विभागीय आयुक्तालयात “ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी’ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर हे जुलैअखेरीस सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या राव यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा आहे. यासोबतच, पीएमआरडीए मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कृषी आयुक्त सुहास दिवसे, तर आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प संचालक जितेंद्र डुडी यांची सांगली जिल्हा परिषद सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
एकटे गायकवाड जबाबदार कसे ?
शहरात वाढलेल्या करोनाची जबाबदारी एकट्या शेखर गायकवाड यांच्यावरच कशी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहरात करोना नियंत्रणासाठी इतर चार सनदी अधिकारी नेमले होते. त्यांच्यासोबत पालिकेच्या लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस आयुक्तांवर होती. या अंमलबजावणीवरून झालेल्या वादामुळे राज्यशासनाने स्वतंत्र आदेश काढत कोणत्या अधिकाऱ्यांना काय अधिकार असतील, याचे स्वतंत्र आदेश काढले होते. त्यानंतर शहरातील करोना नियंत्रणात प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये शीतयुद्ध समोर आले होते. देश “अनलॉक’ होताना, शहर पूर्वपदावर येण्यासाठी गायकवाड यांनी सर्वांत आधी “मायक्रो कंटेन्मेंट झोन’ची यशस्वी अंमलबजावणी केली. त्यामुळे सर्वाधिक करोनाबाधित असलेला भाग सील करून उर्वरित शहरात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली. याशिवाय आरोग्य विभागाच्या सक्षमीकरणासाठी मागील तीन महिन्यांत त्यांच्याकडून सातत्याने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मात्र, त्यानंतरही शासनाने बदली केली आहे. तत्कालीन आयुक्त सौरभ राव यांची फेब्रुवारीतच साखर आयुक्तपदी बदली झाल्यानंतर गायकवाड यांच्याकडे पालिका आयुक्तपद सोपवण्यात आले होते.