वाघोली – पुणे महापालिकेत वाघोली गावाचा समावेश होऊन चार महिने झाले. वाघोली गाव जाण्यापूर्वी ग्रामपंचायतीकडून पूर्ण करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा किरकोळ देखभालीच्या (मेंटेनन्स) खर्चाची अद्यापही पालिकेकडून कोणती तरतूद करण्यात आली नाही. वाघोली गावाच्या पायाभूत सुविधांसाठी व ग्रामपंचायतीकडून झालेल्या विकास कामांना लागणाऱ्या किरकोळ खर्चाची तरतूद करावी करावी अशी मागणी भाजप युवा मोर्चा हवेली तालुकाध्यक्ष अनिल सातव पाटील व वाघोली शहर अध्यक्ष केतन जाधव यांनी पुणे महापालिका आयुक्तांची प्रत्यक्ष भेटून केली आहे.
वाघोली गाव पुणे महापालिकेत समावेश होऊन चार महिने झाले. परंतु पाणी, ड्रेनेज, बांधकाम, पथ, दिवाबत्ती, आरोग्य, जन्म-मृत्यु, विवाह दाखला इ. पायाभूत सुविधांसाठी व ग्रामपंचायतीकडून पुर्ण करण्यात आलेल्या विविध विकास कामांच्या किरकोळ देखभालीच्या खर्चाची कोणतीच तरतुद अदयापपर्यंत महापालिकेकडून करण्यात आलेली नाही. पुणे महापालिकेमध्ये सामाविष्ट करण्यात आलेले वाघोली गाव क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूप मोठे असून गावाची लोकसंख्या अंदाजे दोन लाखांच्या आसपास आहे.
सद्यस्थितीत फुलमळा रोड, दरेकर वस्ती, नगर रोड इ. ठिकाणी रस्त्यावर पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. साचणाऱ्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन सुद्धा केले. त्याचबरोबर कमलबाग व काळूबाई नगर येथे अर्धवट गटार लाईनमुळे व केसनंद रोडवरील चिंतामणी चौक काळे ओढा येथे गटार लाईन फुटल्याने येथील रहिवाशांना येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच सत्तर ते ऐंशी टक्के पथदिवे मेंटेनन्स अभावी बंद आहेत.
वाघोली ग्रामपंचायतीने सातत्याने पाठपुरावा करून वाघोली गावासाठी वढू बुद्रुक बंधाऱ्यातून वढु-वाघोली व वडजाई-वाघोली नवीन पाणीपुरवठा योजनेकरिता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून २२ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. वाघोली ग्रामपंचायतकडून पाणीपुरवठा योजना लवकर पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत होता. परंतु गावाचा समावेश झाल्यानंतर महापालिकेकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने व कोणताही पाठपुरावा नसल्याकारणाने पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. कचरा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी कार्यलयाकडे कचरा प्रकल्प उभारणीसाठी काही सरकारी जागांची मागणी केली होती. परंतु अद्यापही प्रकल्प उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली नसल्याने हा प्रश्न सुद्धा प्रलंबित आहे.
ट्राफिक समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत व एलजी कंपनीकडून काही वर्षांपुर्वी वाघेश्वर चौक, आव्हाळवाडी फाटा व केसनंद फाटा या तीन ठिकाणी ट्राफीक सिग्नल बसविण्यात आले होते. परंतु सद्यस्थितीत मेंटेनन्स अभावी सिग्नल बंद असल्याकारणाने ट्राफिक कोंडीची समस्या मोठयाप्रमाणावर भेडसावत आहे. वाघोली गाव महापालिकेकडे ग्रामपंचायतने २१ प्रस्तावित अपुर्ण कामे पूर्ण करण्याबाबतची यादी महापालिकेला दिली होती.
यामध्ये बहुतांश ड्रेनेजची व इतर कामे अपुर्ण बंद अवस्थेत असून अपूर्ण असलेल्या कामांसाठी महापालिकेने लवकरात लवकर निधी उपलब्ध करून दयावा अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे अनिल सातव व भाजप वाघोली शहर अध्यक्ष केतन जाधव यांनी महापालिका आयुक्तांना प्रत्यक्ष भेटून विविध समस्या सोडवण्याबाबत चर्चा केली. दरम्यान पालिका आयुक्त यांनी सातव पाटील यांनी केलेल्या विविध मागण्या सोडवण्याबाबत सकारात्मकता दाखवली असल्याचे सातव पाटील यांनी सांगितले.
यावेळी महापालिका उप आयुक्त, प्रमुख विभागाचे महापालिका अधिकारी भाजप वाघोली शहर अध्यक्ष केतन जाधव, उपाध्यक्ष संदीप वारे, राहुल वराळ, उपस्थित होते.
“ड्रेनेज, पाणी, लाईट, आरोग्य, जन्म-मृत्युचा व विवाह दाखला आदी मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरुच ठेवणार आहे. नुकतीच पालिका आयुक्तांची भेट घेऊन समस्या मांडल्या आहेत. आयुक्त यांनी समस्या सोडवण्याबाबत यांनी सकारात्मकता दाखवली आहे.”
– अनिल सातव पाटील ( हवेली तालुकाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा)