सातारा – येथील सदाशिव पेठेतील खुटाळे बोळातील केरसुणी विक्रेत्यांची अतिक्रमणे शुक्रवारी हटवण्यात आली. या विक्रेत्यांचा माल जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. ही अतिक्रमणे हटवण्यात आल्याने खुटाळे बोळाने मोकळा श्वास घेतला. सातारा शहरातील वाढती अतिक्रमणे पालिकेसमोरील चिंतेचा विषय बनली आहेत. भवानी पेठ व सदाशिव पेठेच्या हद्दीवरील खुटाळे बोळासमोर रस्त्यावरच पथारी मांडणाऱ्या केरसुणी विक्रेत्यांमुळे ट्रॅफिकची अडचण होत होती. काही सतर्क सातारकरांनी या अतिक्रमणाची तक्रार थेट लोकशाही दिनामध्ये केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून हे प्रकरण पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे आले.
वसंतराव जवळकर यांनी या प्रकरणावर आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली. अतिक्रमण निरीक्षक शैलेश अष्टेकर व प्रशांत निकम व त्यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी खुटाळे बोळात येऊन तेथील केरसुणी विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवले. अचानक झालेल्या कारवाईने विक्रेत्यांची धावपळ झाली. सदाशिव भाजी मंडईतून थेट राजपथावर येण्यासाठी खुटाळे बोळ अतिशय सोयीचा आहे त्यामुळे अरुंद असूनही दुचाकी वाहनांची येथे कायमच गर्दी असते.