मुंबई : युती सरकारच्या काळात अनेक भ्रष्टाचार झाले. आम्ही ते पुराव्यानिशी बाहेर काढले. मात्र एका मंत्र्यावरही कारवाई झाली नाही. उलट क्लिनचीट मास्टर मुख्यमंत्र्यांनी सर्वांना दोषमुक्त जाहीर केले. आपल ठेवायच झाकून..हीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नीती असल्याचा टोला विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी लगावला. मुख्यमंत्री सुडबुद्धीचे राजकारण करत नाहीयेत का असा सवालाही त्यांनी उपस्थित केला आहे.
माजी उपमुख्यमंत्री यांनी आपल्या राजीनाम्याविषयीची पत्रकार परिषद घेतल्यानंतर मुंडे यांनी हे ट्विट केले आहे. युती सरकारमधील काही मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. चार दिवसांपूर्वीही त्यांनी ट्विट करुन तत्कालीन मंत्री प्रकाश मेहता आणि विद्यमान सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या भ्रष्टाराच्या प्रकरणाचा दाखला देऊन ट्विट केले होते. आज पुन्हा त्यांनी यावरुन मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला.
अजित पवारांविषयी ते म्हणाले की, अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात भावनिक व्यक्तीमत्व. सूडाच्या राजकारणाने आदरणीय पवार साहेबांना प्रचंड वेदना झाल्या. काकांना झालेला त्रास दादांना सहन न झाल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. दादांच्या भूमिकेमुळे त्यांच्याबद्दलचा आदर अधिक वाढला, असेही ते म्हणाले.