मुंबई : राज्यात दोन दिवसांपासून सुरु असलेला अनलॉकचा गोंधळ आज अखेर संपला आहे. राज्य सरकारकडून अनलॉकची घोषणा करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश शनिवारी मध्यरात्रीनंतर जारी करण्यात आले. नवीन आदेशानुसार सोमवारपासून पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात अनलॉक होणार आहे. दरम्यान, एकूण पाच स्तरांमध्ये विभागणी करतानाच जिल्ह्यांमध्ये प्रवासासंदर्भातील नियमांमध्येही बदल करण्यात आला आहे.
याबाबत आज मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे की,’नवीन आदेशानुसार सोमवारपासून पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात अनलॉक होणार आहे. अनलॉकच्या प्रक्रियेत मुंबई शहर तिसऱ्या गटात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
त्या पुढे म्हणाल्या,येत्या काळात पहिल्या आठवड्यात मुंबई तिसऱ्या टप्प्यावर असली तरीही येणाऱ्या काही दिवसांमध्ये मुंबई पॉझिटीव्हिटी रेटमध्ये दुसऱ्या टप्प्यात आल्यास त्यानुसार नियम लागू केले जातील. मुख्यमंत्री कार्यालय किंवा खुद्द मुख्यमंत्री काही वेळात याबाबतच्या सूचना जाहीर करतील असेही महापौर म्हणाल्या आहेत.
राज्य सरकारच्या निकषांनुसार सायंकाळी मुंबईतील व्यवहारांसाठीचे एक परिपत्रक काढण्यात येईल. तेव्हा मुंबई शहरातील अनलॉकचे चित्र अधिक स्पष्ट होईल अशी स्पष्टोक्ती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. यावेळी मुंबईकरांना लोकल ट्रेनसाठी कधी सुरु होणार हे स्पष्ट होईल.
दरम्यान, मुंबईतील पॉझिटिव्हीटी रेट हा ५.२५ टक्के असून, ठाणे जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेटही जवळपास ७.५४ टक्क्यांच्या जवळपास आहे. पॉटिव्हिटी रेटनुसार दोन्ही जिल्ह्यांचा समावेश तिसऱ्या गटात होतो. त्यामुळे लोकलमधून प्रवास करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना प्रतिक्षाच करावी लागणार आहे.