कोल्हापूर, दि. 19 – “किती आले किती गेले, मुंबईकरांचे प्रेम फक्त शिवसेनेवरच आहे. मुंबईने शिवसेनेची साथ कधीही सोडली नाही. चांगल्या-वाईट प्रसंगात शिवसेना मुंबईसोबत उभी राहिली आहे. हे मुंबईकरांना चांगलंच माहिती आहे. मुंबईच्या जनतेला माहीत आहे की कोणाला साथ द्यायची, अशा शब्दात परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी ते कोल्हापुरात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.
अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे. आगामी काळातही महानगरपालिकेवर भगवा असेल, पण तो भाजपाचा असेल. असा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. याला अनिल परब यांनी जोरदार उत्तर दिले.
लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ व्हावे, अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे. वीजबिल सवलतीमध्ये अभ्यास करून निर्णय घेतल्यास त्याचा किती जणांना याचा फायदा होतो. याचा अभ्यास करत होतो. येत्या काही दिवसात यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. अशी प्रतिक्रिया परब यांनी व्यक्त केली. विरोधकांचे काम आहे विरोध करायचे. आता त्यांना काही दुसरे काम नाही, असा टोला देखील परब यांनी लगावला.
महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेसच्या नेत्यांना निधीची कमतरता भासते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला जास्त निधी मिळतो. पण कॉंग्रेसला निधी मिळण्यास अडचण होते. असे कॉंग्रेसच्या एका नेत्याने म्हटले होते. त्यावर निधी वाटप हे बसून ठरवता येते. काहींना निधी कमी मिळतो काहीना जास्त मिळे, अशी प्रतिक्रिया परब यांनी व्यक्त केली आहे.