मुंबई – समुद्राची पातळी वाढत असल्याने 2050 पर्यंत जगातील काही महत्त्वाची शहरे समुद्राच्या पोटात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. न्यू जर्सीतील क्लायमेट सेंटर या संस्थेने एक शोधनिबंध सादर केला ज्यात ही धक्कादायक गोष्टी समोर आली आहे. जवळपास समुद्राच्या काठावर वसलेल्या शहरांमध्ये राहणाऱ्या 150 दशलक्ष लोकांना याचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.
भारताची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहरसुद्धा समुद्राच्या पोटात जाण्याची शक्यता आहे. 7 बेटांचे शहर असलेल्या मुंबईतील कुलाबा हे भविष्यात विरारचा भाग होईल. मुंबईची उपनगरे समुद्राच्या पोटात जातील. त्यामुळे येथील रहिवाशांना नवीन ठिकाणी स्थलांतर करण्याचा विचार करावा लागू शकतो.
समुद्राच्या पातळीत वाढ झाल्याने सर्वात जास्त नुकसान दक्षिण व्हिएतनामचे होणार आहे. 20 दशलक्ष लोक सध्या जलमय होणाऱ्या भागात राहात आहेत. व्हिएतनामच्या एकूण लोकसंख्येपैकी ही एक चतुर्थांश इतकी लोकसंख्या आहे. हो ची मिंन्ह ही व्हिएतनामची आर्थिक राजधानी आहे. त्याचेच सर्वाधिक नुकसान होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अख्ख्या जगातल्या पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेले बॅंकॉक शहरही अडचणीत आहे. 2050 पर्यंत बॅंकॉक समुद्राच्या पोटात जाण्याची भीती आहे. तर थायलंडच्या एकूण लोकसंख्येच्या एक टक्का लोकांना याचा फटका बसेल. चीनमधील शांघाय हे आशियातल्या आर्थिक गाड्याचे इंजिन मानले जाते. पण 2050 पर्यंत शांघायचा बहुतेक भागही समुद्राच्या पाण्यात असेल.