मुंबई – मुंबई महानगरात तसेच उपनगरांमध्ये काल रात्रीपासून विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने मुंबईच्या अनेक भागात ताणी तुंबले आहे. या पावसामुळे तसेच पाणी तुंबल्यामुळे मुंबईचे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्रभर अनेक ठिकाणी तुफानी पाऊस झाला. बुधवारी सकाळीही हा पाऊस कायम होता. त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे मुंबई शहरच ठप्प झाल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे. पहाटे पाच वाजल्यापासून मुंबईची उपनगरीय रेल्वे वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सायन-कुर्ला, सीएसएमटी-ठाणे आणि वाशी या मार्गावरील रेल्वे वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याने दिली. तथापि, ठाणे आणि कसारा, तसेच ठाणे आणि कर्जत या मार्गावरील शटल वाहतूक मात्र सुरू ठेवण्यात आली आहे. अन्य गाड्यांच्या वेळापत्रक बदलण्यात आले आहे.
चर्चगेट ते अंधेरी या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने या मार्गावरील सर्वच उपनगरी रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तथापि, अंधेरी ते विरार मार्गावरील गाड्या सुरळीतपणे सुरू आहेत. दरम्यान, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात आजही जोरदार पावसाचे अनुमान व्यक्त करण्यात आल्याने तेथे ऑरेंज ऍलर्ट देण्यात आला आहे. आज पहाटेपर्यंत कुलाबा वेधशाळेत 122 मिलिमीटर तर सांताक्रुुझ वेधशाळेत 273 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.