मुंबई – राज्य सरकारच्या “मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत आजपासून काही प्रमाणात नियम शिथिल करण्यात आले आहेत. तिसऱ्या टप्प्यात अधिक शिथिलता येताच मुंबईकर अक्षरशः सुटले आहेत. अनेक ठिकाणी बेस्ट बससाठी गर्दी पाहायला मिळाली, तर वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झाली. तसेच मुंबईत अनेक ठिकाणी ट्रॅफिक जामचेही “पुनश्च हरि ओम’ झाल्याचे दिसून आले.
तिसऱ्या टप्प्यात खासगी कार्यालये 10 टक्के कर्मचाऱ्यांसह सुरू करण्याला परवानगी देण्यात आली आहे. मुंबई अनलॉक होताच पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात खासगी वाहने रस्त्यावर उतरली. पश्चिम द्रुतगती महामार्गावर चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसल्या. कांदिवली-गोरेगाव भागात पुन्हा पूर्वीप्रमाणे सकाळच्या वेळी वाहतूक कोंडी झाली. अनेक गाड्या एकाच जागेवर बराच वेळ खोळंबून राहिल्या.
ठाण्यातील आनंदनगर मुलुंड टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. लोकल सेवा बंद असल्याने चाकरमानी कामावर जाण्यासाठी बेस्ट किंवा स्वतःची चारचाकी आणि दुचाकींचा वापर करत आहे. त्यामुळे साहजिकच काही प्रमाणात गाड्या टोलनाक्यावरून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी निघाल्या आहेत. ई पास सेवा बंद केल्यामुळे जड अवजड वाहनेही रस्त्यावर येत आहेत.
डोंबिवलीत लोकल बंद आणि अतिशय अपुऱ्या बस सेवेमुळे नोकरदार वर्गाचे प्रचंड हाल होत आहेत. आजपासून अनेक सरकारी व खासगी कार्यालयात जाण्यासाठी दिवा शहरातील नागरिकांची बसमधून प्रवास करण्यासाठी रीघ लागली. इंदिरा चौकापासून फडके रोडपर्यंत ही रांग दिसली.
भाईंदरमध्ये बेस्ट बस पकडण्यासाठी प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. बसमध्ये एका सीटवर एक प्रवासी आणि पाच जणांना उभ्याने प्रवास करून नेले जात आहे. मात्र, रांगांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. अनेकांसाठी प्रवास ही हौस नसून नाईलाज आहे. मात्र, शहरात प्रवासासाठी बंधन उरले नसल्याचा गैरफायदा घेत हिंडणारेही अनेक जण आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत येणारे कर्मचारी किती आणि फिरण्याची हौस भागवणारे किती, हा प्रश्न पडतो.
परप्रांतीय मजूर परतण्यास सुरुवात
लॉकडाऊनमधील शिथिलता मिळाल्यानंतर परराज्यात गेलेले मजूर पुन्हा मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रात परतत असल्याचे चित्र आहे. कारण अवघ्या चार दिवसांत परराज्यातून आलेल्या रेल्वेंमधून अंदाजे 20 हजार लोक महाराष्ट्रात परतले आहेत. लॉकडाऊनदरम्यान परप्रांतीय मजूर आपापल्या गावी गेले होते. मात्र, हळूहळू ते पुन्हा परतू लागले आहेत. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेने आतापर्यंत 60 गाड्या सोडल्या. या विशेष रेल्वेमधून 3 ते 7 जून या चार दिवसांत जवळपास 20 हजार प्रवासी रेल्वेने मुंबई आणि उपनगरात आले आहेत.