मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग प्रकरणात नवा खुलासा समोर आला आहे. सिंग यांच्यावर २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड कसाबचा मोबाईल फोन गायब करण्यास मदत केल्याचा आरोप आहे. हा आरोप मुंबई पोलिस दलातील निवृत्त एसीपी समशेर खान पठाण यांनी केला आहे.
या प्रकरणी समशेर खान पठाण यांनी 26 सप्टेंबर 2021 रोजी मुंबईच्या पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले ज्यामध्ये त्यांनी याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. कसाबला पकडण्यात आले तेव्हा त्या ठिकाणी परमबीर सिंगही आले असल्याचा आरोप पठाण यांनी केला आहे. त्यानंतर परमबीर सिंग यांनी कसाबचा फोन स्वत: जवळ ठेवला जो की तपास अधिकारी रमेश महाले यांच्याकडे द्यायला हवा होता.
दरम्यान, यापूर्वी परमबीर सिंग तपास टाळण्यासाठी देश सोडून पळून गेल्याची माहिती होती, मात्र ते भारतात असल्याची माहिती मिळाली आहे. परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या वकिलाने सांगितले की, मुंबई पोलिसांकडून त्यांच्या जीवाला धोका असल्याने ते लपून बसले आहेत. सिंग यांच्या वकीलांनी सांगितले की ते ४८ तासांत सीबीआय किंवा कोर्टात हजर राहण्यास तयार आहेत.