मुंबई – देशात लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरू आहे. हा लॉकडाऊन येत्या तीन मे रोजी संपणार आहे, पण मुंबई आणि पुणे या दोन शहरांत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. मुंबई, पुण्यामध्ये करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे या दोन शहरांत 18 मे पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो, अशी शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तविली आहे.
या संदर्भात त्यांनी शनिवारी “मिंट’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना खुलासा केला. करोनाचा प्रसार रोखणे हे लॉकडाऊनचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे करोनाचा प्रसार रोखला जात नसेल तर आपल्याला लॉकडाऊनचा कालावधी वाढवावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
टोपे म्हणाले, सध्याच्या परस्थितीत झोपडपट्ट्यांच्या परिसरात करोना रुग्णांची वाढत असलेली संख्या हा चिंतेचा मुख्य विषय आहे. आपल्याला कंटेन्मेंट झोनचा परिसर पूर्णपणे रिकामा राहील, याची काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे कंटेन्मेंट झोन असलेल्या परिसरांसाठी आपल्याला 3 मे नंतर आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढवावा लागू शकतो, असे सुतोवाच त्यांनी केले.
दरम्यान, राज्यात सध्या 512 कंटेन्मेंट झोन आहेत. या दोन शहरांमध्येच करोनाचे सर्वाधिक हॉटस्पॉट आहेत. मुंबईतील तब्बल आठ वॉर्डमधील परिस्थिती अतिगंभीर आहे. यापैकी प्रत्येक वॉर्डात 200 पेक्षा अधिक करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर पुण्यातही करोनाच्या मृतांचा आकडा जास्त आहे. यामुळे मुंबई-पुणेकरांना 3 मेनंतर आणखी 15 दिवस घरात थांबावे लागण्याची शक्यता आहे.