मुंबई – मुंबई पोलिसांनी रिपब्लीक टीव्ही कंपनीला कलम 91 अंतर्गत नोटीस जारी करून त्यांच्या प्रत्येक व्यवहाराचा तपशील मागवला आहे. या टीव्हीच्या स्थापनेपासूनचे हिशोब पोलिसांनी मागवले आहेत. त्यावर या टीव्ही कंपनीने चांगलीच आगपाखड केली आहे.
या संबंधात त्यांनी जे निवेदन जारी केले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की, मुंबई पोलिसांनी आमच्याकडून प्रत्येक व्यवहाराचा तपशील मागवला आहे याचा अर्थ आम्हाला आता येथे वापरण्यात आलेले टॉयलेट पेपर, सॅनिटायझर, आमची प्रत्येक मशिनरी याचा सर्वच खर्चांचा तपशील त्यांना द्यावा लागणार आहे.
सीआरपीसीच्या कलम 91 अंतर्गत मुंबई पोलिसांनी आमच्यावर बजावलेली नोटीस म्हणजे वृत्तपत्र स्वातंत्र्यावरच घाला आहे. आमची छळवणूक करण्याचाच हा प्रकार आहे असेही त्यांनी म्हटले आहे. टीआरपी घोटाळ्यात आमचे नाव खोटेपणाने गुंतवून आम्हाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न मुंबई पोलिसांनी चालवला आहे असा आरोपही अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लीक टीव्हीने केला आहे.