मुंबई : मुंबई एनसीबीच्या पथकाचे धाडसत्र सुरूच असल्याचे दिसत आहे. मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात पथकाने सोमवारी रात्री छापेमारी केली. या छापेमारीत तब्बल 100 किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी एनसीबी पथकाने तीन जणांना ताब्यात घेतले आहे. छापेमारी अद्याप सुरु असल्याची माहिती मुंबई एनसीबीने दिली आहे.
नांदेडमध्ये अंमली पदार्थाची निर्मिती करणाऱ्या एका फॅक्टरीचा एनसीबीने सोमवारी भांडाफोड केला आहे. सोमवारी एनसीबीने नांदेड, जालना आणि औरंगाबाद शहरात छापेमारी केली. एनसीबीची कारवाई अद्याप सुरु आहे.
ळालेल्या माहितीनुसार, एनसीबीच्या मुंबई येथील पथकाने सोमवारी नांदेड शहरात एका व्यापारी संकुलावर धाड मारली. या व्यापारी संकुलातल्या एका जागेतून जवळपास एक क्विंटल अफू जप्त करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत एनसीबीची कारवाई सुरू होती. जवळपास पंचवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बाजारात 7 ते 12 हजार रुपये किलो या दराने अफू विक्री होते. काल रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. अफू विक्रीवर प्रतिबंध असून नांदेडमध्ये काहीजण बनावट आणि जुन्या परवान्याच्या आधारावर अफू विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती आहे.
नांदेड शहरातील माळटेकडी परिसरातील डोडा भुकटी अंमली पदार्थ कारखान्यावर धाड टाकून मोठ्या प्रमाणात डोडा भुकटी पावडर मुंबई NCB च्या पथकाने हस्तगत केल्याचीही माहिती मिळाली आहे. डोडा भुकटी अंमली पदार्थ कारखान्याचा पर्दाफाश करत व मुद्देमाल जप्त करत NCB ने ह्या कारखान्यास सील ठोकले आहे. याठिकाणी मुंबई NCB पथकाला रस्त्या लगत असणाऱ्या एका हॉटेल पाठीमागे हा डोडा कारखाना चालत होता.
या कारखान्यातून NCB मुंबई च्या या पथकास मोठ्या प्रमाणात पोत्यामध्ये भरलेला डोडा व भुकटी अंमली पदार्थ ताब्यात घेऊन सील करण्यात आला आहे. NCB मुंबई च्या चार अधिकारी असणाऱ्या या पथकाने समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सुधाकर शिंदे यांच्या नेतृत्वात या अगोदर नायगाव येथील मांजरम येथे मोठ्या प्रमाणात गांजा कार्यवाही केली होती. आज याच पथकाने नांदेडात कार्यवाही करत तीन जणांना ताब्यात घेत,डोडा भुकटी अंमली पदार्थ कारखाना सील केला आहे.