मुंबई – राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा वाढल्यामुळे कोरोना संसर्गामुळे हैराण नागरिकांना आता उष्णतेचा सामना करावा लागत आहे. मुंबई शहरासह, नाशिक, सोलापूर, अकोला, सिंधुदुर्ग, रत्नागिरीत उकाडा वाढला आहे. पुढच्या काही दिवसांत उष्णता आणखी वाढणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
मुंबईचा पारा शनिवारी 41 अंशांवर पोहोचला. राजस्थानकडून महाराष्ट्राच्या दिशेने वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे उष्णतेची लाट आल्याची माहिती हवामान खात्याचे उपमहासंचालक जयंता सरकार यांनी दिली आहे. तापमान 42 अंशावर पोहोचल्याने रत्नागिरी जिल्हावासियांना उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत आहे.
पुण्यातही तापमान चाळीशीच्या जवळ पोहोचले आहे. रस्त्यावर ट्रॅफिक सिग्नलला कारच्या एसीमधून येणाऱ्या गरम वाफा, तापलेले सिमेंटचे रस्ते, आग ओकणाऱ्या आरसीसीच्या इमारती आणि वाहनांच्या धुराड्यातून बाहेर पडणारा धूर तीव्र उन्हाळ्याची जाणीव करुन देत आहे. त्यामुळे सरबते आणि आईस्क्रमसह थंड पदार्थांसाठी मार्केट निर्माण होत असताना, करोनाच्या भीतीमुळे कोणीही थंड पदार्थ खाण्यास धजावत नाहीये.
मार्च महिना संपत आलेला असतानाच एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात कमालीचे बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. भर दुपारी वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे, तर रात्री हवेत काहीसा गारवा जाणवत आहे. भारतीय हवामान विभाग आणि स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस दक्षिण भारतात केरळ, तमिलनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तापमान चाळीशी पार करेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता बाहेर जाण्याचा प्रश्न येत नाही. परंतु तापमानातील अशा अचानक बदलांमुळे आरोग्य बिघडण्याचा धोका असतो. त्यामुळे कोरोनासोबतच आता वाढत्या तापमानाचाही सामना करावा लागणार आहे. तळकोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काहीसे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.