मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सरकारी कार्यालये आठवडाभर बंद ठेवणार असल्याच्या वृत्ताचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंगळवारी खंडन केले. मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मात्र कामकाज सुरू राहण्यासाठी नेमकी किती उपस्थिती आवश्यक आहे, याचा आढावा घेऊन कार्यालयात कमीत कमी उपस्थितीत काम चालेल तेवढीच उपस्थिती ठेवण्याचा निर्णय घेण्याचे संकेत त्यांनी दिले. त्याचवेळी गर्दी कमी झाली नाही तर मात्र लोकल बंद ठेवण्यासारखा कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
ते म्हणाले, सध्या राज्यात कोरोनाचे 40 जण बाधीत आहेत. तर मंगळवारी तिसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मात्र बस आणि ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. पण जर गर्दी कमी केली नाही तर असे कठोर निर्णय घेण्यास पर्याय राहणार नाहीत. असे कठोर निर्णय घेण्याची आमची इच्छा नाही. पण गर्दी कमी झाली तर असे निर्णय घ्यावे लागतील. जनतेने सहकार्य करावे, असे ते म्हणाले.
पुण्यात काहींनी स्वेच्छेने दुकाने बंद ठेवली आहेत. तशी जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य दुकाने काही दिवस बंद ठेवावी. म्हणजे काही प्रमाणात गर्दी कमी होईल. अन्य कार्यालयातही 50 टक्के कर्मचारी कामावर बोलावून अन्य कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानगी द्यावी, असे खासगी क्षेत्राला आवाहन करत आहोत. जनतेने स्वयंशिस्त पाळली तर हा धोका टाळला जाऊ शकतो, असे सांगून त्यांनी पुढील 15 दिवस हे कसोटीचे आहेत, या वक्तव्याचा पुनरूच्चार केला.
कोरोना चाचणीचे किट केंद्राकडून येतात. त्याचे वाटप चाचणी केंद्रांना गरजेप्रमाणे करण्यात येते. या चाचणीसाठी आवश्यक किटची चाचणी एनआयव्हीकडून केली जात आहे. या चाचणी घेण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी देणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याबाबतचा निर्णय या बैठकीत झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सिध्दी विनायक, शिर्डी, ज्योतिबा यांसारख्या देवस्थान बंद ठेवण्याचा निर्णय घेणाऱ्या विश्वस्तांचे मी आभार मानतो. तसेच सर्वच धर्मीयांची प्रार्थनास्थळे मग त्यात मंदिरे, मस्जीद, चर्च, दर्गा आणि गुरूद्वारा यांनी ती बंद ठेवली तर त्याचा गर्दी कमी करण्यासाठी उपयोग होऊ शकतो. मी त्यांच्या विश्वस्तांना तसे आवाहन करतो, असे ते म्हणाले.