चेन्नई – सूर्यकुमार यादव आणि इशान किशनने केलेल्या फलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा सहा गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. नाणेफेक जिंकूण प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने निर्धारित 20 षटकांत 5 बाद 131 धावांची मजल मारुन मुंबईसमोर विजयासाठी 132 धावांचे लक्ष्य ठेवले.
प्रत्युत्तरात खेळताना मुंबईने हे आव्हान 17.2 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात 132 धावा करत हे आव्हान पुर्ण करत अंतिम फेरी गाठली. प्रत्युत्तरात उतरलेल्या मुंबईची सुरूवात खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा 4 तर डी कॉक 8 धावा करुन परतल्यावर सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी डावाची सुत्रे आपल्या हातात घेत भागिदारी करण्यावर भर दिला. यावेळी दोघांनीही मुंबईला पॉवरप्लेच्या सहा षटकांमध्ये संघाला 44 धावांची मजल मारुन दिली. त्यामुळे चेन्नईचा संघ दबावात आला.
यावेळी यादवने वेगाने तर इशान किशनने सावध पवित्रा अवलंबत मुंबईची धावगती कायम ठेवल्याने मुंबईने 9 षटकांत 59 धावांची मजल मारली. यानंतर यादवने फटकेबाजी करायला सुरूवात करत 13.2 षटकांत मुंबईला शतकी मजल मारून दिली. मात्र, यानंतर लागलीच इशान किशन 28 धावा करुन परतला तर त्यानंतरच्या चेंडूवर कृणाल पांड्या बाद झाल्याने मुंबईची 4 बाद 101 अशी अवस्था झाली. यानंतर आलेल्या हार्दिक पांड्याला साथीत घेत यादवने मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. यावेळी यादवने नाबाद 66 धावांची खेळी केली.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना चेन्नईची सुरूवात खराब झाली सलामीवीर शेन वॉटसन (10), फाफ ड्यु प्लेसिस (6) आणि सुरेश रैना (5) हे फलंदाज स्वस्तात परतल्यानंतर मुरली विजय (26), अंबाती रायडू आणि महेंद्रसिंग धोनीने फटकेबाजी करत चेन्नईचा डाव सावरला यावेळी रायडूने 37 चेंडूत नाबाद 42 तर महेंद्रसिंग धोनीने 29 चेंडूत नाबाद 37 धावा केल्या.