मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या तब्बल पंधरा वर्षांच्या इतिहासात मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्ज याच दोन संघांनी वर्चस्व राखले होते. मुंबईने तब्बल पाच वेळा तर चेन्नईने चार वेळा ही स्पर्धा जिंकली. यंदाच्या मोसमात मात्र, या दोन संघांना प्लेऑफ गटातही प्रवेश करता आलेला नाही. त्यांचे अद्याप काही सामने बाकी असले व हे सर्व सामने या संघांनी जिंकले तरीही त्यांचा या फेरीतल प्रवेश निश्चित होणार नाही.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाने यंदाच्या स्पर्धेत सलग आठ पराभव स्वीकारल्यावर नववा सामना जिंकत श्रीगणेशा केला. मात्र, त्यांचे अद्याप पाच सामने बाकी असून हे सर्व सामने त्यांनी जिंकले तराही त्यांचे गुण 12 होतील व प्लेऑफसाठी किमान सोळा गुणांची गरज असल्याने मुंबईचे यंदाच्या स्पर्धेतील आव्हान संपुष्टातच येणार आहे.
दुसरीकडे चेन्नईचे 10 सामन्यांतून 6 गुण असून उरलेले चार सामनेही जिंकले तरी त्यांचे 14 गुण होतील व त्यांनाही प्लेऑफ गटात पात्र होता येणार नाही. म्हणजेच गेल्या वर्षीप्रमाणे चेन्नईला यंदाच्या स्पर्धेत दबदबा राखता आलेला नाही. जी स्थिती चेन्नईची तीच थोड्या फरकाने मुंबईची बनली आहे. या स्पर्धेत त्यांनी सर्वाधिक विजेतेपद मिळवत आपले वर्चस्व कायम राखले होते.
यंदाच्या मोसमात मात्र त्यांना चमक दाखवता आली नाही. गुजरात टायटन्सने या पूर्वीच प्लेऑफमध्ये प्रवेश केला असून आता उरलेल्या तीन स्थानांसाठी प्रचंड चुरस पाहायला मिळणार आहे. लखनौ सुपर जायंट्सने उरलेल्या चार पैकी एक सामना जरी जिंकला तरीही त्यांचे 16 गुण होतील व त्यांचाही प्लेऑफमधील प्रवेश निश्चित होईल.
उरलेल्या दोन जागांसाठी राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर बेंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स व कोलकाता नाईट रायडर्स या सर्व संघांमध्ये चांगलीच चुरस रंगणार आहे. स्पर्धा सुरुवातीपासूनच आश्चर्यकारक निर्णयांमुळे गाजत आहे. त्यातच ज्यांना विजेतेपदाचे दावेदार मानले जात होते, त्यांनी सुमार कामगिरी केली आहे तर ज्यांची गणतीही केली जात नव्हती ते गुजरात व लखनौ हे यंदाच्या स्पर्धेतील दोन नवे संघ बाजी मारताना दिसत आहेत.