मुंबई : तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुंबईत काल रात्रीपासूनच जोरदार वारे वाहू लागले होते. आज सकाळपासून अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडतो आहे. समुद्रात मोठ्या लाटा उसळत असून, मुंबईतल्या चौपाट्यांवर फिरायला पोलिसांनी प्रतिबंध केला आहे.
तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम मुंबई आणि उपनगरांमध्ये सोमवारी दुपारनंतर जास्त जाणवू लागला आहे. किनाऱ्याजवळ तर तुफान वेगाने वारे वाहात आहेत. पूर्व आणि पश्चिम उपनगरात दुपारी 11 वाजल्यापासून तुफान पावसालाही सुरुवात झाली आहे.दरम्यान मरीन ड्राईव्ह येथे समुद्राच्या उंच लाटा पाहायला मिळाल्या आहेत.
अरबी समुद्रात निर्माण झालेलं आणि अतितीव्र स्वरुपाच्या तौक्ते चक्रीवादळानं अधिक तीव्र स्वरुप धारण केलं आहे. ते गुजरातच्या दिशेनं सरकत असून सध्या मुंबई किनारपट्टीच्या पश्चीमेला 120 किलोमीटर अंतरावर असल्याची मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.
दरम्यान, ‘ तौक्ते’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.