मुंबई – राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेतही कडक निर्बंध असताना विकासाचा वेग मंदावला नाही. मुंबई शहराला दिशा आणि वेग देणाऱ्या नव्या पिढीच्या विचारांना प्रत्यक्षात उतरविण्यात आल्याने मेट्रोचं काम आखीव रेखीव आणि देखणे झाले आहे. करोनाचा धोका अजुनही टळला नाही. त्यातुळे गाफील न राहता आयुष्याला ब्रेक लागणार नाही याची दक्षता घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
डहाणूकरवाडी ते आरे स्थानका दरम्यानच्या मेट्रो मार्गिकांच्या चाचणीचा शुभारंभ, पश्चिम द्रुतगती महामार्ग (टर्मिनल 1 अणि 2) येथील नियंत्रित प्रवेश भुयारी-उन्नत मार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन, राजणोली उड्डाणपुल मार्गिका आणि दुर्गाडी पुलाच्या दोन मार्गिकांचा ई लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नवाब मलिक उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, आजचा कार्यक्रम हा या महानगराला दिशा आणि वेग देणारा आहे. वर्षभराहून अधिक काळ करोनाचे सावट राज्यावर आहे. मात्र याकाळात उपचारांच्या सुविधा निर्माण करतानाच मुंबईसारख्या वेगवान महानगराचा विकासाचा वेग कमी होऊ दिला नाही. मुंबई वाढतेय तसा तिच्या विकासाचा वेगही कायम राखतोय, असेही त्यांनी सांगितले.
विविध पायाभूत आणि दळणवळणाच्या प्रकल्पांमुळे मुंबई जो वेग घेत आहे त्या प्रवासात मुख्यमंत्री म्हणून सहभागी होता आले असे सांगतानाच मेट्रोची स्थानके, कोच यासाठी नव्या पिढीच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबई आधुनिकतेची कास धरणार शहर असलं तरी त्याला प्राचिनतेचा वारसा आहे. आगळंवेगळं विविधतेने नटलेल्या शहरात होत असलेली विकास कामे हे सांघिक यश असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
करोना रोखण्यासाठी जे निर्बंध आहेत ते अजून उठवलेले नाही. गर्दी करू नका. करोनाचा धोका अजून संपलेला नाही. यामुळे गाफील राहिलो तर आयुष्याच्या वेगाला ब्रेक लागेल, असा इशारा देतानाच करोना काळात विकास कामांचा पुढचा टप्पा वेगाने पार पाडावा, असे आवाहन त्यांनी केले.
“हेरिटेज ट्री’ संकल्पना राबविणार
महाराष्ट्राला देशात प्रगतीशील राज्य बनविण्यामध्ये मुंबईचा मोठा वाटा आहे. राज्याचा प्रगतीचा वेग कायम राखण्यासाठी देशाच्या आर्थिक राजधानी वेगवान ठेवण्याच काम विविध पायाभूत प्रकल्पांच्या माध्यमातून होत आहे. गेल्या सव्वा वर्षांत करोनाची पहिली लाट, दुसरी लाट, निसर्ग-तौक्ते चक्रीवादळ अशी नैसर्गिक संकटे आली. मात्र त्यावर मात करीत राज्याच्या विकासाला खीळ बसू दिली नाही. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात एका दिवसात 30 किमी लांबीचा डांबरी रस्ता तयार करण्याचे काम झाले असून त्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत देखील रात्रीच्या बारा तासात सिमेंट रस्ता तयार करण्याचे काम हाती घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. वादळात मोठी झाडं उन्मळून पडल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली त्यातून झालेल्या चर्चेनुसार हेरिटेज ट्री हा संकल्पना महाराष्ट्र राबविणार असल्याचे पवार यांनी सांगितले.