अहमदाबाद – शम्स मुलाणीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत गोवा संघावर 119 धावांनी मात करत निर्णायक विजय प्राप्त केला.
या लढतीत मुंबईचा पहिला डाव अवघ्या 163 धावांवर गुंडाळत गोवा संघाने थाटात प्रारंभ केला.
तसेच आपल्या पहिल्या डावात एकनाथ केरकर, लक्ष्य गर्ग व अमोघ सुनील देसाई यांच्या खेळीच्या जोरावर सर्वबाद 327 धावा करत मुंबईवर 164 धावांची आघाडी घेतली. मुंबईच्या शम्स मुलाणीने 6 गडी बाद केले. मुंबईने आपल्या दुसऱ्या डावात मात्र, जबाबदारीने फलंदाजी केली.
पिछाडी भरून काढत मुंबईने 9 बाद 395 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला. गोवा संघासमोर विजयासाठी 232 धावा करण्याचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना गोवा संघाचा दुसरा डाव 48 षटकांत 112 धावांवर संपला व मुंबईने 119 धावांनी निर्णायक विजय मिळवला. पहिल्या डावात 6 गडी बाद करणाऱ्या शम्स मुलाणीने या डावात 5 गडी बाद केले.