74 टक्के भागभांडवल विकत घेणार असल्याची घोषणा
नवी दिल्ली – मुंबई विमानतळाचे 74 टक्के भागभांडवल गौतम अदानी संचलित अदानी उद्योग समूह खरेदी करणार आहे. त्याचबरोबर इतर सहा शहरांतील विमानतळांचे कंत्राटही अदानी समूहाने निविदा प्रक्रियेतून मिळविलेले आहे. त्यामुळे अदानी समूह आता भारतातील सर्वात मोठा विमानतळ चालविणारा उद्योग होणार आहे.
मुंबई विमानतळातील जीव्हीके एअरपोर्ट डेव्हलपर्सचे 50.50 टक्के भागभांडवल अदानी समूह घेणार आहे. त्याचबरोबर इतर दोन गुंतवणूकदारांकडील 23.50 टक्के भागभांडवल अदानी समूह खरेदी करणार आहे.
जीव्हीके समूहावर मोठ्या प्रमाणात कर्ज आहे. हे कर्ज अदानी समूह स्वतःकडे घेणार आहे. त्या माध्यमातून मुंबई विमानतळाचे भाग भांडवल अदानी समूहाकडे येणार आहे. भारतातील बंदर व्यवस्थापनात अदानी समूहाचा मोठा वाटा आहे. त्याचबरोबर लखनऊ, जयपूर, गुवाहाटी, अहमदाबाद विमानतळांचे नियंत्रण अदानी समूहाकडे येणार आहे.
या व्यवहाराबद्दल बोलताना जीव्हीके समूहाचे अध्यक्ष जीव्हीके रेड्डी यांनी सांगितले की, लॉकडाऊन नंतर विमान वाहतूक क्षेत्राच्या महसुलावर प्रचंड परिणाम झाला आहे. यामुळे या क्षेत्रात अधिक भांडवल असलेल्या समूहाने काम करण्याची गरज आहे. यामुळे आम्ही हा व्यवहार करण्यासाठी पुढाकार घेत आहोत. अदानी उद्योग समूहाने म्हटले आहे की, मुंबई विमानतळाला भांडवलाची आवश्यकता होती.
त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. भारतातील विमानतळे जागतीक विमानतळाइतकी आधुनिक आणि कार्यक्षम होण्याची गरज आहे. कारण आगामी काळात भारतातील विमानाने प्रवास करशेरांची संख्या वेगाने वाढणार आहे. त्यामुळे आम्ही या क्षेत्राबाबत आशावादी असून विस्ताराचे काम हाती
घेणार आहोत.
मुंबई म्हणजे स्वप्नांचे शहर! पृथ्वीतलावरील सर्वात मोठ्या महानगरीतील विमान प्रवाशांची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे. भारतीय विमानतळे विकसित करण्याची ही मुहूर्तमेढ आहे.
– गौतम अदानी, अदानी उद्योग समूह प्रमुख